पुणे । प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाने (बालभारती) बदललेल्या अभ्यासक्रमाची इयत्ता १२ वीची पाठ्यपुस्तके मंडळाच्या सर्व भांडारांमधून दिनांक २७ मे पासून विक्रीसाठी उपलब्ध झाली आहेत. शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून आणि लाभार्थी नसलेल्या इ. १ ली ते इ. ११ वी च्या विद्यार्थ्यांना खुल्या बाजारामध्ये पुस्तक विक्रेत्यांमार्फत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे.
यावर्षीपासून इयत्ता १२ वीचा अभ्यासक्रम बदलला आहे. आता बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तके सर्वत्र उपलब्ध झाली आहेत. गर्दी टाळण्यासाठी सुरुवातीला विज्ञान शाखेची पुस्तके उपलब्ध केली असून पुढील दोन दिवसात वाणिज्य व कला शाखेची पुस्तके उपलब्ध असतील.
सुमारे ९५ लाख पीडीएफ झाल्या डाऊनलोड
खाजगी व विनाअनुदानित शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांकरता पाठ्यपुस्तके खुल्या बाजारातून पुस्तक विक्रेत्यांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र लॉकडाऊनच्या काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून इयत्ता १ ली ते इयत्ता १२ वी च्या सर्व पाठ्यपुस्तकांच्या पीडीएफ फाईल्स मंडळाच्या वेबसाईटवर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. मंडळाच्या इतिहासात प्रथमच बाजारात पुस्तके उपलब्ध होण्याआधी त्याच्या पीडीएफ फाईल्स ऑनलाईन मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या.त्याला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. आजपर्यंत इयत्ता १२ वी च्या २४ लाख व इयत्ता १ ली ते ११ वी च्या ७० लाख ९२ हजार पीडीएफ फाईल्स डाऊनलोड केल्या गेल्या आहेत.
लॉकडाऊनच्या काळात देखील पाठपुस्तक मंडळाने पुस्तकांची निर्मिती प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. आता सुरक्षेच्या नियमांचे पालन करीत इयत्ता पहिली ते बारावीची सर्व पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या पाठ्यपुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांकरिता ऑनलाइन पद्धतीने पुस्तकांची मागणी नोंदविण्या करीता पाठ्यपुस्तक मंडळाने यंत्रणा विकसित केली आहे. पुस्तक विक्रेते व शैक्षणिक संस्थांना ऑनलाईन पद्धतीने मंडळाकडे पुस्तकांची मागणी नोंदवता येणार आहे.