Friday, May 3, 2024
HomeUncategorizedअर्थचक्राला लवकरच गती

अर्थचक्राला लवकरच गती

गुणवंत राठी

कोविडची साथ संपेल आणि आपला देश वेगाने प्रगती करेल. मात्र यापुढे कमाईच्या एकाच स्त्रोतावर अवलंबून राहता येणार नाही. गुंतवणूकही स्मार्टपणे करावी लागेल.

- Advertisement -

संपूर्ण जगात पसरलेल्या ‘कोविड-19’ या महामारीमुळे सामान्य माणसाची अर्थव्यवस्थाच कोलमडली आहे. पगारात कपात होणे, नोकर्‍या जाणे, पर्यायी नोकरीच्या संधी नसणे. व्यवसायांमध्ये मंदी येणे अशा परिणामांमुळे सामान्य माणूस अतिशय त्रस्त झाला आहे.

परंतु ही तात्पुरती स्थिती आहे. कारण कोविडची साथ लवकरच संपणार आहे आणि भारतीय माणसाची जीवनशैली आणि प्रगती करत राहण्याची सवय पाहता येत्या काही वर्षांत आपला देश नक्कीच चांगली प्रगती करेल, असा मला विश्वास आहे.

दोन प्रकारच्या देशांची प्रगती वेगाने होत असते. एक म्हणजे जे मोठ्या प्रमाणात निर्यात करत असतात आणि दुसरे जे मोठ्या प्रमाणात खर्च करत असतात. आज आपला भारत हा जगात सर्वाधिक तरुण लोकसंख्येचा देश आहे.

जगाच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेतही आपल्याकडील तरुणांची संख्या प्रचंड आहे आणि त्याची मानसिकताही मोकळ्या हाताने खर्च करणारी आहे. शिवाय या 2020 सालात 90 टक्के जनतेला कोविडच्या साथीचा फटका बसल्यामुळे सर्वांचेच डोळे उघडले आहेत.

विविधमार्गी उत्पन्नाची गरज

काही वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या लोकांचे शेवटचे मासिक वेतन पन्नास ते साठ हजार रुपये होते. तरीही ते अतिशय समाधानी आयुष्य जगले. याउलट आजच्या तरुणांना पहिलाच पगार 35 ते 50 हजार रुपये मिळत असूनही किमान जीवनावश्यक गरजा पूर्ण करतानाही एकाच स्त्रोतावर अवलंबून निश्चितपणे जगत होते.

आता नवीन युगाची सुरुवात विविधतापूर्ण असेल. आता कमाईचे अनेक स्त्रोत असलेले आणि हुशारीने खर्च करणारे लोकच खंबीरपणे पाय रोवून उभे राहू शकतील. येत्या दोन दशकांत सर्व्हिस सेक्टर म्हणजेच विविध प्रकारच्या सेवा पुरवणारे व्यवसाय सर्वाधिक प्रगती करतील.

या क्षेत्रात काम करणारे लोक मोठी झेप घेऊन प्रगत स्थानी स्थिरावतील. व्यवहारांचा वेग वाढेल आणि त्यात मोठ्या प्रमाणात पारदर्शकताही येईल. हे नवे तंत्र स्वीकारून जगणारेच टिकून राहून प्रगती करतील. त्याच्याशी जुळवून घेऊ न शकणारे मागे पडतील.

व्याज व करात सुधारणा

यापुढे कर रचनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा होतील. प्रत्यक्ष करसंकलनातही बदल होतील. त्याची पूर्वतयारी म्हणूनच सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांचे मोठ्या प्रमाणात विलीनीकरण सुरू केले आहे. देना बँक आणि विजया बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले आहे.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले आहे. देशात इतकी वर्षे 25 हून अधिक राष्ट्रीयीकृत बँका कार्यरत होत्या. विलीनीकरण पूर्ण झाल्यानंतर मोजक्याच राष्ट्रीयीकृत बँका संपूर्ण देशात कार्यरत असतील.

बँकांतील मुदत ठेवींवरील व्याजदर आताच 5% ते 6% पर्यंत घसरले असून यापुढेही ते कमी होत जाणार आहेत. त्यामुळे फिक्स डिपॉझिटमध्ये दीर्घकाळ पैसे अडकवून ठेवण्याचे प्रमाण खूप कमी होत जाईल. त्याचवेळी पूर्वीच्या तुलनेत कर्जही स्वस्त दराने उपलब्ध होईल.

येत्या चार वर्षांत म्हणजे 2024 पर्यंत सोन्याचा दर प्रतितोळा (दहा ग्रॅम) एक लाखाच्या वर, तर चांदीचा दर येत्या वर्षभरातच म्हणजे 2021 पर्यंत प्रतिकिलो एक लाखाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

काही महत्त्वाच्या सूचना

दरमहा एक ग्रॅम सोन्याची खरेदी करा. इंडियन इक्विटी मार्केटमध्ये मजबूत मूल्य असलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करा. सध्या नकारात्मक परतावा दिसत असला तरीही एसआयपीमधील गुंतवणूक सुरू ठेवा. कोणत्या शहरात कोणत्या परिसरात रिअल इस्टेटमधील गुंतवणूक फायदेशीर ठरेल, याचा दूरदर्शीपणे विचार करा.

- Advertisment -

ताज्या बातम्या