जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ अभियानात आतापर्यंत जळगाव जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 26 लाख 24 हजार 575 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण करण्यात आली आहे,अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासनाने माझे कुटुंब- माझी जबाबदारी हे अभियान 15 सप्टेंबर 2020 पासून सुरू केले आहे.
जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे 2 हजार 532 पथकांची नियुक्ती केली आहे. यात आरोग्य सेवकासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिलेल्या दोन स्वयंसेवकांचाही समावेश आहे.
आरोग्य विभागाची पथके जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यातील 6 लाख 50 हजार 602 घरांना भेट देवून 29 लाख 21 हजार 401 नागरिकांची 10 ऑक्टोबर 2020 पर्यंत तपासणी करणार असल्याचे सीईओंनी सांगितले.
910 करोनाबाधित रुग्ण शोधण्यात आरोग्य पथकांना आले यश
जळगाव जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य पथकांनी आतापर्यंत 5 लाख 87 हजार 123 कुटूंबांना भेट दिली असून या कुटूंबातील 26 लाख 24 हजार 575 नागरिकांची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे.
या तपासणीत आरोग्य पथकांना 76 हजार 514 जुन्या विकारांचे रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, हद्यविकार, कर्करोग, मधुमेह, अस्थमा, किडनी विकार, क्षयरोग, लठ्ठपणासह इतर आजारांचाही समावेश आहेत.
तर सारी व सर्दी, खोकला, ताप (–खङख) चे 6 हजार 808 रुग्ण आढळून आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या संशयितांची तपासणी करण्यात येवून त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 910 कोरोना बाधित रुग्ण शोधण्यात आरोग्य पथकांना यश आले आहे.
या रुग्णांवर विविध कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे यांनी सांगितले.
सर्दी, अन् सारीचे आढळले रुग्ण
जिल्ह्यातील 5 लाख 87 हजार 123 कुटूंबांतील 26 लाख 24 हजार 575 नागरिकांची तपासणी पूर्ण करण्यात आली असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आढळून आले 76 हजार 514 जुन्या विकारांचे रुग्ण आढळले आहेत.
तसेच ग्रामीण भागात सारी व सर्दी, खोकला, तापाचे 6 हजार 808 रुग्ण आढळून आले. जिल्हा परिषदेसह जिल्हा प्रशासनाची यंत्रणा रात्रंदिवस काम करीत आहे.
आता नागरिकांनीही घराबाहेर पडताना मास्कशिवाय बाहेर पडू नये,असे आवाहन सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी केले.