येवला तालुक्यातील कोटमगावात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती या तीन देवींच्या मुखांची एकत्रित मूर्ती आहे. यामुळे हे देवस्थान आपली वेगळी ओळख जपून आहे. कोटमगावतील जगदंबा मातेच्या मंदिरामुळे गावाचा आता विकास झाला.
येवल्यापासून पूर्व दिशेला तीन किलोमीटरवर औरंगाबाद-नाशिक मार्गावर कोटमगाव आहे. तीन मुखांची जगदंबेची मूर्ती बहुधा इतरत्र कुठेच पाहावयास मिळत नाही. त्यामुळेच नवरात्रोत्सवात दहाही दिवस महाराष्ट्रासह शेजारील राज्यांमधूनही भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी येथे येत असतात.
कोटमगाव देवस्थानामुळे येवला तालुक्याचे नाव इतर राज्यांमध्ये पोहोचले आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास विभागाकडून ‘धार्मिक पर्यटन स्थळ’ म्हणून या देवस्थानाच्या विकासासाठी विशेष प्रयत्न झाले आहेत. पर्यटन खाते नाशिक जिल्ह्याकडे आल्यावर या स्थानाच्या विकासाकडे अधिक जाणीवपूर्वकरीत्या लक्ष देण्यात आले असून सात कोटी ९३ लाख रुपये या देवस्थानच्या विकास कामांवर खर्च करण्यात आला आहे.
विकसित झालेल्या या देवस्थानच्या जुन्या भक्त निवासाचे नूतनीकरण, नवीन ४२ खोल्यांचे बांधकाम पूर्णत्वास गेले आहे. दुमजली सभागृहाचे कामही पूर्ण झाल्याने नवरात्रोत्सवात घट बसविणार्या भाविकांची उत्तम सोय झाली. पूजा साहित्य विक्रीसाठी मुबलक गाळे तयार करण्यात आले आहेत.
कोटमगाव देवस्थानच्या विकासात परिसरातील सामाजिक संस्था, संघटना यांचाही मोलाचा वाटा आहे. घट बसविणार्या भाविकांसाठी येवला ते कोटमगाव अशी वाहनांची मोफत सेवा काही संघटना, रिक्षाचालक-मालक संघटना करीत असतात. सुमारे ३० वर्षांपासून धडपड मंच या संस्थेच्या वतीने ‘मोफत चरणसेवा’ हा भाविकांची पादत्राणे सांभाळण्याचा उपक्रम राबविला जातो. सर्व विकास कामे पूर्ण झाल्याने या देवस्थानचे सौंदर्य अधिक खुलले आहे.