अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
नगर जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारावा यासाठी सरकारने राज्यात 300 शाळांची निवड करून
त्या आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यात नगर जिल्ह्यातील तालुकानिहाय एक अशा 14 शाळांचा समावेश आहे.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सोमवारी हे परिपत्रक काढले. यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषणा केल्यानुसार पहिल्या टप्प्यात राज्यातील तीनशे जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. प्रत्येक तालुक्यातून एक अशा राज्यात 300 शाळा निवडण्यात आल्या आहेत.
त्यात नगर जिल्ह्यातून 14 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. आदर्श शाळांच्या व्याख्येत शासनाने भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता आणि काही प्रशासकीय बाबींचा समावेश केला आहे. या आदर्श शाळांमधील प्रगती पाहून इतर शाळांमधील मुले या शाळेत येथील किंवा इतर शाळांनीही आदर्श शाळाप्रमाणे अंमलबजावणी करून गुणवत्ता वाढवावी असा शासनाचा याद्वारे उद्देश आहे.
राज्य सरकार पातळीवर निवड झालेल्या शाळांमध्ये अकोले (विरगाव), जामखेड (देवदैठण), कर्जत (रेहेकुरी), कोपरगाव (धोत्रे) नगर (भोरवाडी), नेवासा (खूपटी), पारनेर (हंगा) पाथर्डी (मिडसांगवी), राहाता (गोल्हारवाडी (राजुरी), राहुरी (वांजुळपोई), संगमनेर (पिंपरी लौकी आजमपूर), शेवगाव (बालमटाकळी), श्रीगोंदा (हंगेवाडी) आणि श्रीरामपूर (उक्कलगाव) यांचा यात समावेश आहे.