जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :
दिवाळी अवघ्या काही दिवसावर येवून ठेपली असतांना बाजारपेठेत चहलपहल मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर शहरातील एटीएमवर नागरिक पैशांसाठी धाव घेत आहेत. मात्र अनेक एटीएमवर खडखडाट दिसून येत असल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे.
रस्त्यालगत असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम, स्टेट बँकेचे एक एटीएम व शहरातील इतर ठिकाणचे एटीएमवर पैसे मिळत नव्हते त्यामुळे नागरिक एका ठिकाणाहून दुसर्या एटीएमकडे जातांना दिसून येत होते. नागरिकांची तुफान गर्दी बाजारात खरेदीसाठी होवू लागली आहे.
शहरातील सुभाष चौक, बेंडाळे चौक, बळीराम पेठ, कोर्ट चौक, नवे बसस्थानक परिसर, रेल्वे स्थानक परिसरासह शहरात येणारे बहुतेक रस्ते परिसर गर्दीने फुल झाले होते.
बळीराम पेठ, एम जी रोड, टॉवर परिसर, फुले मार्केट, गोलाणी मार्केट, शनी पेठ या परिसरात तर चालायला जागा नाही एवढी तुफान गर्दी दिसून आली.
शेतकरी वर्गाच्याही हातात आता पैसा येवू लागला आहे. तसेच मोलमजुरी करणार्यांच्या हातात मजुरीचा पैसा येवू लागल्याने बाजारात गेल्या चार ते पाच दिवसापासून गर्दी वाढू लागली आहे.
बसस्थानकांवर गर्दी
गेल्या चार ते पाच दिवसापासून बसस्थानकांवर दिवाळीनिमित्त बाहेरगावाहून येणार्यांची गर्दी वाढू लागली आहे तसेच महिला वर्गाची गर्दी वाढू लागली आहे. काही सासरवाशीणी या आपल्या माहेरी येवू लागल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकावर रात्री उशीरापयर्र्त आता प्रवाशी दिसू लागले आहेत.
करोनाच्या प्रादुर्भावामुळे सार्वजनिक वाहतुकीला बंदी होती. किमान पाच महिने तरी नागरिक, प्रवाशांसह सर्वच घटकांना याचा त्रास सोसावा लागला तसेच बसस्थानकांनाही फटका सोसावा लागला. किमान 15 दिवस तरी प्रवाशांची वाट बसस्थानकांवर पहावी लागली होती.
आता गेल्या आठवड्यापासून नागरिक बाहेर पडू लागले आहेत. तसेच दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडू लागल्याने प्रवाशांची गर्दी आता वाढू लागली आहे. बसेस 100 टक्के सुरू झालेल्या आहेत. रेल्वे मात्र लोकल स्तरावर अजून सुरू नाहीत.
बाजारपेठा फुल्ल !
गेल्या चार ते पाच दिवसापासून बाजारपेठा अगदी फुल्ल होवू लागल्या आहेत. दिवाळी म्हटली म्हणजे खाण्याचीच दिवाळी असे म्हटले जाते. त्यामुळे खाण्याचे पदार्थ मेवा मिठाईचे पदार्थ घेण्याकडे नागरिकांचा ओढा अधिक असते. विशेषत: महिला वर्गाचा अधिक असतो.
महागाईच्या फटक्यामुळे व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे घरोघरी बनविण्याचे पदार्थांचे प्रमाण कमी झाले आहे. शेव वगैरे हॉटेलचे पदार्थ शक्यतो बनविणार्याकडून गाव, गल्लीबोळात महिला वर्ग करुन घेत असत. मात्र यावेळी शक्यतो बाजारातूनच बहुतेक पदार्थ घेण्याकडे गृहीणींचा कल दिसून येत आहे.
विविध साहित्याची खरेदी
ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी शहरात होवू लागली आहे. विशेषत: किराणा मालासह चैनीच्या वस्तू, इलेक्टीकल वस्तू खरेदीसाटी मोठी गर्दी होवू लागली आहे.
इलेक्ट्रीक उपकरणे, फ्रीज, टीव्ही, होम थिएटरला बर्यापैकी मागणी आहे. टी.व्ही दुकानदारांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक ननवीन स्किमा लागू केल्या आहेत.
त्याद्वारे ग्राहकाना आकर्षित करण्याचा प्रयत्न दुकानदारांकडून केला जात आहे. तसेच मोबाईल मार्केट तर रोजच फुल्ल होत आहे.
अनेक नवनवीन प्रकारचे मोबाईल स्वस्त किंमतीत मार्केटमध्ये दाखल झाल्याने खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. विशेषत: तरुण वर्गाचा ओढा अधिक आहे.