नाशिक | Nashik
शहर व जिल्ह्यात करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नाशिकमध्ये कर्फ्यु लावण्यात येत असल्याचे संदेश सोशल मीडियातून पसरवले जात होते.
मात्र, ही निव्वळ अफवा असून नाशिकमध्ये लाॅकडाऊन अथवा कर्फ्यु लावला जाणार नाही, असे जिल्हाप्रशासनाने स्पष्ट केले आहे.
अफवा पसरविणार्याविरुध्द कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.एकूणच रविवारी दिवसभर अफवांचा बाजार गरम होता.
देशभरात करोनाची दुसरी लाट पहायला मिळत आहे. करोना रुग्णांची घटलेल्या संख्येत दिवाळीनंतर भर पडत आहे. देशातील गुजरात, केरळ, हरियाणा या राज्यांमध्ये सुरु करण्यात आलेल्या शाळा पुन्हा बंद कराव्या लागल्या. अहमदाबादमध्ये करोनाची साखळी तोडण्यासाठी कर्फ्यु लावण्यात आला आहे.
तर दिल्लीमध्येही लाॅकडाउनची शक्यता वर्तवली जात आहे. ते बघता महाराष्ट्र सरकारही जपून पावले टाकत आहे. नाशिकमधील करोना परिस्थिती व शाळा सुरु करायच्या की नाही याबाबत निर्णय घेण्यासाठी रविवारी पालकमंत्री भुजबळाच्या उपस्थितीत बैठक बोलाविण्यात आली होती.
त्या पार्श्वभुमीवर रविवारी सकाळपासून नाशिकमध्ये पुन्हा लाॅकडाऊन, जनता कर्फ्यु लागू होणार असे आशयाचे संदेश व्हाटसअप, फेसबुकवर फिरत होते. काही वृत्तवाहिन्याच्या कर्फ्युच्या जुन्या बातम्या शेअर केल्या जात होत्या. त्यामुळे व्यापारी, दुकानदार व सर्वसामान्य नाशिककरांमध्ये सभ्रंमाचे वातावरण निर्माण झाले होते. सोशल मीडियावर वेगाने असे मॅसेज शेअर केले जात होते.
अखेर जिल्हाप्रसासनाने कर्फ्यु अथवा लाॅकडाऊन ही निव्वळ अफवा असल्याचे स्पष्ट केले. कोणिही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले. तसेच खोटे संदेश व अफवा पसरविणार्याविरुध्द कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाप्रशासनाकडून देण्यात आला.