सिन्नर | Sinnar
रतन इंडिया कंपनीने गेल्या चार महिन्यांपासून पगार न दिल्याने गुळवंच, मुसळगावच्या 125 प्रकल्पग्रस्त कामगारांनी गेट बंद आंदोलन सुरू केले आहे.
रतन इंडियाच्या सेझसाठी शेतजमिनी दिलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या एक 125 पाल्यांना कंपनीने प्रशिक्षण देऊन कंपनीत नोकरी दिली आहे. त्यातील अनेक कामगार फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नरसह विविध कामे करतात.
या कामगारांचा चार महिन्यापासून पगार झालेला नाही. आपला हक्काचा पगार मिळावा यासाठी या कामगारांनी पाठपुरावा केला. मात्र कंपनीची आर्थिक परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत कोणालाही पगार मिळणार नाही. कंपनी सुरू होईल तेव्हा तुम्हाला पगार सुरू होईल अशी भूमिका कंपनीच्या प्रशासनाने घेतली आहे.
त्यामुळे आपला हक्काचा पगार मिळावा यासाठी हे कामगार कंपनीच्या प्रवेशद्वारावर बसले असून कंपनीत येणारी सर्व वाहने प्रवेशद्वारातून परत पाठवली जात आहेत. ज्यांनी आपल्या शेतजमिनी प्रकल्पासाठी दिल्या, त्यांना कंपनी बाहेरचा रस्ता दाखवत असून नाशिक येथून कामगार न चुकता दररोज येत आहेत. हा अन्याय सहन करायचा नाही. आम्हाला आमच्या हक्काची नोकरी व पगार मिळालाच पाहिजे अशी या कामगारांची भूमिका आहे.
प्रवेशद्वार बंद करण्याचे आंदोलन करणार असल्याचे पत्र या कामगारांनी मुसळगाव पोलीस ठाणे व आमदार माणिकराव कोकाटे यांना दिले असून प्रशासनाच्यावतीने या कामगारांशी बोलण्यासाठी कोणीही पुढे न आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.