पिंपळनेर – Pimpalner – वार्ताहर :
कांदा विक्रीचे पैसे शेतकर्यांना व्यापार्याकडून न मिळाल्याने अखेर संबंधित व्यापार्याला पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
गेल्या नऊ ते दहा महिन्यांपूर्वी शेतकर्यांनी मार्केटमध्ये बिजासनी कंपनीचे मालक व्यापारी दीपक सोनू पाटील यांना कांदा विक्री केला होता. मात्र शेतकर्यांना अद्यापही पैसे मिळाले नाही. त्यामुळे शेतकर्यांनी आंदोलन केले होते.
व्यापारी पैसे देत नसल्याने शेतकर्यांनी मार्केट कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी संतप्त शेतकरी व शाखाप्रमुख पोलीस ठाण्यात व्यापार्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता, तत्कालीन अधिकार्यांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली होती.
यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रस्ते आस्थापना विभागाचे जिल्हाध्यक्ष धीरज देसले यांनी आयजींशी दूरध्वनीवर संपर्क साधून पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करीत असल्याचे त्यांच्या निदर्शनात आणून दिले होते.
त्यांतर आयजी छोरिंग दोर्जेे यांनी एसपी विश्वास पांढरे यांना दूरध्वनीवर निर्देश दिल्यानंतर संबंधित तत्कालीन अधिकारी एपीआय राठोड यांनी संजय बावा यांची फिर्याद नोंदवून घेतली होती.
त्यानुसार संबंधित बिजासनी कंपनीचे व्यापारी दीपक सोनू पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मात्र त्यानंतरही न्याय मिळत नसल्याने संबंधित शेतकर्यांनी नाशिक येथे जाऊन आयजी प्रताप दिघावकर यांची भेट घेतली. त्यानंतर साक्री येथेही आयजींना निवेदन दिले होते.
घटनेचा तपास यानंतर अधिक वेगाने झाल्याने पोलिसांनी सापळा रचुन नाशिक येथून गोपनीय माहितीच्या आधारे कांदा व्यापारी दीपक सोनू पाटील यांना अटक केली.
त्याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी देण्यात आली. आता कांदा विक्री केलेल्या शेतकर्यांना त्यांचे पैसे मिळणार का, असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत. घटनेचा अधिक तपास पीएसआय भूषण हंडोरे हे करीत आहेत.