पारनेर (तालुका प्रतिनिधी) –
सज्जन, प्रामाणिक आणि चारित्र्यवान उमेदवारालाच येणार्या निवडणुकीत निवडून देण्याचे आवाहन लोकजागृती सामाजिक संस्थेचे
रामदास घावटे, बबन कवाद, रंजना पठारे यांनी केले. हे अभियान लोकजागृती सामाजिक संस्था व परिवर्तन फाउंडेशनचे कार्यकर्ते तालुकाभर राबविणार आहेत. या अभियानासाठी पारनेर तालुका निवडणूक प्रशासनाची परवानगी घेण्यात आलेली आहे. तालुक्यातील जवळे येथे ग्रामपंचायत निवडणूक 2021 च्या मतदार जागृती अभियानाचा प्रारंभ झाला.
हा उपक्रम लोकजागृती सामाजिक संस्थेमार्फत राबविण्यात येत आहे. ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असते. व्यंगचित्रांच्या माध्यमांतून राजकिय पुढार्यांच्या समाजविघातक कृतींचे चित्रण दाखवणारे बॅनर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आले आहेत. ग्रामीण भागातील राजकीय पुढार्यांचे व्यभिचारी रंग व त्यामुळे झालेली सामाजिक हानी याचेही वास्तव या व्यंगचित्रांतून रेखाटले आहे.
आपल्या गावातील पंचायत कारभारी कसे असावेत व कसे असू नयेत, त्यासाठी याबाबतच्या खास व्यंगचित्र कलाकृती तयार करून घेण्यात आल्या आहेत. या उपक्रमातून चांगले समाजप्रबोधन होऊ शकते, असे मत पारनेर परिर्तन फाउंडेशनचे सचिन भालेकर, भाऊसाहेब खेडेकर, अरुण आंधळे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या कांता लंके, ज्ञानदेव पठारे, गजानन सोमवंशी, मुक्तार ईनामदार, श्रीधर गाडीलकर, बाळासाहेब कवाद, रामदास सालके, बारकू पठारे, सोमेश्वर आढाव, महेंद्र पठारे, सखाराम पठारे, आनंदा साळवे उपस्थित होते. भारत माता की जय…! वंदेमातरम्…! भारतीय संविधानाचा विजय असो…! अशा घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.