कोलकाता | Kolkata
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असून राजकीय वातावरण तापू लागले आहे. तसेच राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील नाराज मंत्र्यांची संख्या वाढतच आहे. ममता बॅनर्जी यांना अजून एक धक्का बसला आहे.
ममता बॅनर्जी सरकारमधील वनमंत्री राजीव बॅनर्जी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राजीव बॅनर्जी यांनी आपला राजीनामा थेट राज्यपालांकडे पाठवला असून, ममता बॅनर्जींसाठी हा मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. राज्यपाल जगदीप धनखर यांनी राजीव बॅनर्जी यांचा राजीनामा स्वीकारला आहे. सरकारमधून राजीनामा देणारे रजीब बॅनर्जी तिसरे मंत्री आहेत. “मला आपणास कळवताना खेद होतो आहे की, मी आज २२ जानेवारी २०२१ रोजी वनमंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. पश्चिम बंगालच्या जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळाले. हा माझा सन्मान आहे. ही संधी मला मिळाली, त्याबाबत मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देतो” असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, “पक्षातील काही नेते कार्यकर्त्यांचं शोषण करत आहेत. काही कार्यकर्त्यांचा वापर करत माझ्याविरोधात खोटा प्रचार केला जात आहे,” असं राजीब बॅनर्जी यांनी १६ जानेवारीला झालेल्या फेसबुक लाईव्हमध्ये सांगितलं होतं. यावेळी त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. राजीब बॅनर्जी यांनी पक्षातील काही नेते आपल्याविरोधात प्रचार करत असल्याची तक्रार केल्याच्या दुसऱ्या दिवशीच राजीनामा दिला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांनी सरकार आणि पक्षाच्या विरोधात अनेकदा अप्रत्यक्षपणे टीका केली होती. टीएमसीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री पार्थ चॅटर्जी यांनी त्यांच्यासोबत चर्चादेखील केली होती.