दिल्ली | Delhi
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली.
महाराष्ट्रात बिघडलेली कायदा आणि सुव्यवस्था, करोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकारला आलेले अपयश, राज्य सरकार वरून जनतेचा उडालेला विश्वास पाहता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी या मागणीचे निवेदन रिपब्लिकन पक्षाच्या वतीने ना. रामदास आठवले यांनी आज राष्ट्रपतींची भेट घेऊन दिले.
यावेळी झालेल्या चर्चेत माननीय राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या मागणीचा विचार करू असे आश्वासन दिले असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली.
रामदास आठवले यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटल आहे की, ‘उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांची गाडी आणि त्यानंतर झालेल्या घटनाक्रमात महाराष्ट्रच्या गृह विभागाची प्रतिमा कलंकित झाली आहे. सचिन वाझे प्रकरण, त्यानंतर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप, महिन्याला 100 कोटींची हफ्ता वसुली या सारख्या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या गृह विभागाची प्रतिमा डागाळली असून जनतेत भीतीचे वातावरण आहे. करोनाच्या महामारीचा महाराष्ट्रात वेगाने फैलाव होत आहे. तीन पक्षांचे राज्य सरकार निर्णय घेण्यात कमालीचे उदासीन असून राज्याचा विकास खुंटला आहे. नाकर्तेपणा असलेल्या राज्य सरकार मुळे जनतेत निराशेचे वातावरण आहे. निसर्ग वादळ, करोना संकट सर्व आघाड्यांवर निष्क्रिय राहिलेले महाविकास आघाडीचे राज्य सरकार आहे.’ असे आठवले यांनी निवेदनात म्हंटले आहे.