मुंबई | Mumbai
तौत्के चक्रीवादळामुळे देशाची पश्चिम किनारीपट्टी ढवळून निघाली आहे. तौत्केने महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत कहर केला आहे. या चक्रीवादळामुळे वेगवेगळ्या भागात मुसळधार वारा आणि पाऊस पडत आहे.
दरम्यान, चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडल्याने मोठं जहाज बुडाल्याची घटना घडली. रविवारी सायंकाळी जहाजावरून एसओपी संदेश मिळाल्यानंतर नौदलाने मदत व बचावकार्य हाती घेतलं होतं. जहाजावर २६० लोक होते, त्यापैकी १४७ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं असून, इतरांचा शोध घेतला जात आहे. नौदल आणि ओएनजीसीच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली.
भारतीय नौसेनेच्या जवानांकडून जहाजावर अडकलेल्या लोकाना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता आणि इतर मोठी जहाजेही या मोहिमेमध्ये गुंतलेली आहेत. नौदलाची हेलिकॉप्टरही या कामात गुंतलेली आहेत. अद्याप याठिकाणी शोधमोहिम सुरू आहे.