मुंबई | Mumbai
दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची नव्याने चौकशी करण्याची मागणी तिच्या आई-वडिलांनी केली आहे. दिशाचा सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा याचिकेतून करण्यात आला आहे. दिशा सालियनच्या मृत्यूची स्वतंत्र, निष्पक्ष, पारदर्शक चौकशी करा अशी मागणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी याचिकेद्वारे हायकोर्टात केली आहे. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करून आदित्य ठाकरेंसह अनेकांवर गंभीर आरोप केला आहे. आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. आता याप्रकरणी ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, प्रकरण कोर्टात आहे तर कोर्टात बोलू. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने बदनामीचा प्रयत्न होतच आहे. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, मी तुम्हाला वारंवार सांगितले आहे, माझे तुम्ही ट्विट तुम्ही पाहिले असेल किंवा आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही या सरकारला एक्स्पोज केले आहे. फक्त आम्ही नाही तर संघानी पण एक्सपोज केले आहे. काल संघातले देखील लोक बोलले की औरंगजेब हा विषय चुकीचा आहे. मग आता भाजपचे मंत्री त्यांच्यावर कारवाई मागणार का? आज आम्ही हाच प्रश्न विचारात आहे की, महाराष्ट्राला क्राइम्समध्ये कुठे नेऊन ठेवलेले आहे? महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्या, शेतकऱ्यांची परिस्थिती असेल याच्यात तर महाराष्ट्राची परिस्थिती बिकट होत चाललेली आहेच. पण त्याच सोबत माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी त्यांच्या अधिवेशनातील भाषणामध्ये बोलताना भाजपचे किंवा या महाझुटीचे जे काही प्रमुख मुद्दे होते, ज्याच्यावर निवडणूक जिंकले असते असे ते बोलतात, हे निवडणूक आयोगामुळे वोटर फ्रॉडमुळे जिंकले.
दरम्यान, सत्ताधाऱ्यांना या मुद्द्यावरून सभागृह बंद पाडायचे असेल, तर पाडू देत, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले. “आज आम्ही हाच प्रश्न विचारतोय की महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? भाजपाने त्यांच्या जाहीरनाम्यातील १० मुद्द्यांपैकी एकाही आश्वासनाचा अर्थसंकल्पात समावेश केलेला नाही. औरंगजेबावर, हिंदुत्वावर आम्ही त्यांना उघडे पाडले. एका मंत्र्याला राजीनामाही द्यावा लागला. हे सगळे झाल्यानंतर आज सभागृह कशावरून बंद पाडायचे तर माझ्यावरून बंद पाडायचे. पाडू देत सभागृह बंद. पण जनता हाच प्रश्न विचारतेय की तुम्ही तर सत्ताधारी पक्षातले आमदार आहात. तुम्हाला आम्ही काम करायला निवडून दिलेय. बोला ना महाराष्ट्राबद्दल. चर्चा करा”, असे ते म्हणाले.
तर दिशा सालियन प्रकरणावर बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंना तात्काळ अटक करा अशी मागणी केली. ‘दिशा सालियनच्या वडिलांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली आहेत त्यांच्यावर कारवाई करावी. दिशा सालियनच्या वडिलांनी माझ्या मुलीवर सामूहिक बलात्कार करून खून केल्याचा आरोप केला आहे. सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे अन्य लोकांना जो न्याय लागतो तो या तिघांवर लावावा अशी मागणी आम्ही केली आहे.’, असे नितेश राणे म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा