अहिल्यानगर/ चौंडी |प्रतिनिधी| Ahilyanagar
नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती ऊर्जा, शक्ती, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे आणि म्हणूनच नदी म्हणजे नारीशक्ती! या विचाराला जलसंवर्धन, संस्कृती आणि विकासाची जोड देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 च्या शुभारंभातून एक नवीन विकास मॉडेल मांडलं. एवढंच नव्हेतर गोदा ते नर्मदा ही केवळ यात्रा नाही, तर नारीशक्ती, जलसंवर्धन आणि विकासाचा नवा महामंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
श्रीक्षेत्र चौंडी हे मराठी संस्कृतीचे माहेरघर येथे झालेल्या या सोहळ्यात त्यांनी राजमाता जिजाऊ आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी नमन करत शिंदे यांनी भाषणाची सुरुवात केली. चौंडी (जन्मभूमी) ते महेश्वर (कर्मभूमी) हा प्रवास केवळ भौगोलिक नसून आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सांगड घालणारा आहे. या यात्रेपूर्वी अहिल्यादेवी स्मारकाचे पूजन, जलकलश पूजन आणि जन्मभूमीच्या पवित्र मातीचा कलश पूजन करण्यात आले. माती आणि पाणी हेच आपल्या जीवनाचे मूळ, असे सांगत शिंदेंनी परंपरेचा गौरव केला. नाशिक त्रंबकेश्वर येथे असा उपक्रम राबवला जात आहे. जन्मभूमीतील पवित्र माती व जलकलश शिर्डीमार्गे मध्य प्रदेशातील महेश्वर येथे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या यात्रेला राज्याबरोबरच राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले आहे.
जल नसेल तर जग नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट आणि ग्लोबल वॉर्मिंगच्या पार्श्वभूमीवर जलसंवर्धनाचे महत्व सांगितले. समाज केवळ राजकारणावर नाही, तर धर्म आणि अध्यात्मावर चालतो, असे सांगत त्यांनी वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेचे महत्त्वही अधोरेखित केले. ही जलयात्रा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून जलसाक्षरता, जनजागृती आणि महिला सक्षमीकरणाचा व्यापक उपक्रम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गोदा ते नर्मदा ही केवळ यात्रा नाही, तर नारीशक्ती, जलसंवर्धन आणि विकासाचा नवा महामंत्र असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सभापती शिंदे म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून जलसंवर्धनाचे महत्त्व अधोरेखित होते. गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा 2026 ही त्यांच्या कार्याला उजाळा देणारी असून या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडविण्याचा संकल्प आहे. जन्मभूमी ते कर्मभूमी या संकल्पनेतून चौंडी येथून निघालेली ही यात्रा जनतेमध्ये जलसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करेल, असे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. सर्वप्रथम या जलयात्रेचा शुभारंभ श्री क्षेत्र चौंडी येथून मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या भूमीची माती आणि सीना नदीतील पवित्र जलपूजन करून कलश घेऊन यात्रा महेश्वरकडे मार्गस्थ झाली.





