अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर राज्य महामार्गावर, विशेषतः लिंबेजळगाव ते कायगाव, नेवासा फाटा ते नगर या पट्ट्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच रस्ता अत्यंत खराब झाला असून हा मार्ग दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवघड वाहतूक करणार्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. या ठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी पॅचिंगचे काम सुरू असून अनेक ठिकाणी रस्ता वन वे करण्यात आलेला आहे. हा वन वे जीवघेणा ठरत असून यामुळे अपघात वाढलेले दिसत आहे.
छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर राज्य महामार्गावर नेवासा ते अहमदनगर दरम्यानचा 50 किमीचा रस्ता खड्ड्यांमुळे चाळण झाला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ कमालीचा वाढला आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या ठिकाणी दररोज अपघात सुरू आहेत. त्यातच वाहतूक कोंडीमुळे या मार्गावरून प्रवास करणार्यांचे हाल होतांना दिसत आहे. नागरिकांच्या जिवासोबत इंधन टंचाईच्या काळात अतिरिक्त इंधनासह वाहनांना क्लच बर्नआउट सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या रस्त्याचे दुरुस्तीचे काम संथ गतीने सुरू असून कंत्राटदारांच्या दुर्लक्षामुळे अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहे. हा रस्ता खराब असल्याने वाहतूक धीमी झाली असून अनेक वाहने रस्त्याच्या मधोमध अडकून पडत आहेत.
अनेक वर्षांपासून दुरुस्तीची कामे अर्धवट असल्याने नागरिक आणि प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या मार्गावरून जाणार्या प्रवाशांना, विशेषतः रात्रीच्या वेळी, मोठी जोखीम पत्करावी लागत आहे. प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी, जेणेकरून प्रवाशांचा जीव वाचेल, अशी आहे. दरम्यान, या मार्गावर खड्डे असणार्या ठिकाणी पॅचिंग करण्यात येत आहे. या पॅचिंगच्या कामामुळे हा रस्ता एकरी बंद करून त्या ठिकाणी वाहतूक सुरू आहे. या मार्गावर एकेरी वाहतुकीचा अंदाज येत असल्याने अवघड वाहनांना अपघात होत असून यातून वाहतूक कोंडीची समस्या वाढली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात या ठिकाणी अपघातात आपला जीव गमवावा लागलेल्यांची संख्या मोठी आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाचे या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे.
दुरूस्तीचे आश्वासन हवेत
नगर शहरातून जाणार्या छत्रपती संभाजी महाराजनगर रोडचे काम नगरच्या मनपा निवडणुकीनंतर पूर्ण करण्याचे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, आता त्याला देखील मोठा कालावधी लोटला असून या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार असा प्रश्न या ठिकाणाहून प्रवास करणार्यांकडून विचारण्यात येत आहे.
तातडीने रस्ता दुरूस्ती आवश्यक
छत्रपती संभाजी महाराजनगर रस्त्याचे काम तातडीने सुरू करून ते पूर्ण करणे आवश्यक आहे. या ठिकाणी पॅचिंगच्या कामामुळे अनेक रस्ता वनवे करण्यात आला आहे. यामुळे अपघात वाढले आहेत. तसेच या अपघातामुळे वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. यामुळे बांधकाम विभागाने तातडीने रस्त्याची दुरूस्ती करावी
– राजेंद्र कदम, उद्योजक, अहिल्यानगर.





