अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दसर्यानंतरच अपेक्षित उघडीप देण्याच्या शक्यतेला मुंबईसह कोकण व विदर्भ वगळता, उर्वरित महाराष्ट्रातील मराठवाडा, खान्देश, नाशिक, अहिल्यानगर, पुणे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर अशा 18 जिल्ह्यातून काहीसा दिलासा मिळणार आहे. या सर्व जिल्ह्यात पूर्णतः नव्हे, परंतु काहीशी उघडीपीची शक्यता असून केवळ तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचीच शक्यता आहे.
याबाबतची माहिती पुण्याचे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली असून मुंबईसह कोकण व विदर्भातील 18 जिल्ह्यात मात्र, दसर्यानंतरही तेथे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. महाराष्ट्रावरून पाऊस पाडत सरकलेले हवेचे कमी दाब क्षेत्र सोमवारी सौराष्ट्रात पोहोचले असून पुढील 24 तासात ते अरबी समुद्रात उतरून पुन्हा तीव्र कमी दाबात रूपांतर होवून ते ओमानकडे मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. मात्र, देशात परतीच्या मार्गांवर असलेला मान्सून, शुक्रवार 3 ऑक्टोबरपर्यंत, वेरावळ भरूच उज्जैन झाशी शहाजहाणपूर या शहरादरम्यानच्या सीमारेषेवर पुढील पाच दिवस अजूनही जाग्यावरच थबकण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पावसाच्या उघडीपीच्या शक्यतेमुळे कांदा रोप टाकणी, खरीपातील मका, सोयाबीन, बाजरी भुईमूग या पीकांची काढणी, द्राक्षे-बाग छाटणी, वाफस्यानंतरच्या भाजीपाला पीक काढणी, हरबरा व ज्वारी पेरणी, रब्बीच्या पुढील इतर लागवडीसाठीची रान तयार करणे, इत्यादीसारख्या शेतकामांचा शेतकामांना चालना मिळू शकते.
अंदमानजवळील कमी दाबक्षेत्र वायव्येकडे सरकणार
मंगळवार आज (दि. 30) दरम्यान अंदमानजवळ बंगाल उपसागरात कमी दाबाचे क्षेत्रनिर्मिती व त्यानंतर त्याचे उत्तर व उत्तर मध्य भारताकडे त्याच्या मार्गक्रमणाच्या शक्यतेतून महाराष्ट्रात 8-9 ऑक्टोबर दरम्यानच्या झोडापण्याच्या स्वरूपाच्या रब्बी पावसाच्या चौथ्या आवर्तनाचा अपेक्षित धोका सध्या कमी दिसत असल्याचे खुळे यांनी स्पष्ट केले आहे.




