अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जनगणनेच्या कामासाठी यंदा बहुतांश जिल्हा परिषद कर्मचार्यांना जबाबदारी दिल्याने त्यांच्या बदली प्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. या वर्षी सरकारच्या सुचनेनूसार जनगणनेचे कामे दिले जाणार नसल्याने आरोग्य, महिला बालकल्याण व पशूसंवर्धन विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या करण्यात येणार आहेत. या बदल्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून नव्याने बदल्याचे वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने 2027 च्या जनगणनेचे देशव्यापी वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत पार पडेल, तर 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना केली जाणार आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषदेतील जनगणना कामाशी संबंधित क आणि ड वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषद शिक्षकांची यंदा बदली न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने तसे पत्र सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांना पाठवले आहे. जनगणना कामाशी संबंधित क आणि ड वर्ग संवर्गातील कर्मचारी तसेच सर्व शिक्षक यांची सन 2026 ची बदली प्रक्रिया राबविण्यात येऊ नये, असे या पत्रात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, अहिल्यानगर जिल्हा परिषदेने जनगणनेशी संबंधित कर्मचारी वगळून बदल्यांची प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी 6 ते 8 मे दरम्यानचे वेळापत्रक जाहीर केले होते. दुसरीकडे जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाकडे कोणते कर्मचारी जनगणनेशी संबंधित आहेत, याची माहिती मागवली होती. यातील बहुतांशी माहिती जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाकडे उपलब्ध झाली आहे. यात माहितीनूसार जिल्ह्यात आरोग्य विभाग, महिला बालकल्याण आणि पशूसंवर्धन विभागातील कर्मचार्यांची बदली प्रक्रिया होणार आहे. या विभागातील एकाही कर्मचार्याला जनगणनेचे काम देण्यात आलेले नाही. यामुळे या विभागातील कर्मचार्यांच्या बदल्या राबवण्यात येणार आहेत. या बदल्यासाठी सामान्य प्रशासन विभागाकडून नव्याने वेळापत्रक तयार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
बदल्यांमधून गुरूजींची सुटका
दरवर्षी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचा विषय गाजत असतो. जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची 11 हजार पदे कार्यरत आहेत. दरवर्षी यातील शिक्षकांची मोठ्या संख्याने बदली होत असते. गेल्या काही वर्षापासून शिक्षकांच्या बदल्या या ऑनलाईन पध्दतीने होत असून यंदा जनगणेच्या कामासाठी बहुतांशी शिक्षकांच्या ऑर्डर झालेली आहे. यामुळे यंदाच्या बदल्यामधून त्यांची सुटका झालेली आहे. यामुळे अनेक गुरूजींनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.





