Friday, September 20, 2024
Homeनगरजिल्ह्यात सोयाबीन, तुरीची सर्वाधिक पेरणी

जिल्ह्यात सोयाबीन, तुरीची सर्वाधिक पेरणी

अहमदनगर । प्रतिनिधी

- Advertisement -

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात २० जुलैपर्यंत जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे. विशेष करून नगर दक्षिणेत हे प्रमाण अधिक असून उत्तरेतील काही तालुक्यांत वरूण राजा अद्याप रुसलेलाच आहे.

मात्र, अशा परिस्थितीत जिल्ह्यात यंदा खरीप हंगामासाठी सरासरीच्या १२० टक्क्यांच्या पुढे पेरण्या झालेल्या आहेत. यात सोयाबीन पिकाची १ लाख ६० हजार हेक्टरवर पेरणी झालेली असून त्याची टक्केवारी ही १८१ टक्के तर तूर पिकाची ७० हजार हेक्टरवर पेरणी झालेली असून ही सरासरीच्या १९५ टक्के झालेली आहे. मात्र, दुसरीकडे यंदा जिल्ह्यात बाजरी पिकाची पेरणी सरासरीच्या ४६ टक्के झालेली असून बाजरी पिकाच्या क्षेत्रात कमालीची घट नोंदवली गेली आहे.

नगर जिल्ह्यात जिल्ह्याचे खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र ५ लाख ७९ हजार ६७८ हेक्टर आहे. दरवर्षी पडणारा पाऊस आणि हवामान खात्याच्या प्राथमिक माहितीच्या आधारे कृषी विभाग खरीप हंगामाच्या पेरण्या प्रस्ताविक करतात. यानुसार यंदा ६ लाख ७९ हजार ७६८ हेक्टवर खरिपाच्या पेरण्या प्रस्ताविक करण्यात आल्या होत्या. मात्र, पावसाच्या बदललेल्या चित्राने कृषी विभागाच्या अंदाजाला चकवा देत सरासरीपेक्षा अधिक पेरण्या झालेला आहेत.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या जाहिरातीत झळकले हरवलेले बाबा; विरोधकांचं टीकास्त्र

विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागात नगर, पारनेर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड या भागात खरीप हंगामाच्या शतप्रतीशतपेक्षा अधिक पेरण्या झालेल्या आहेत. या भागात पावसाचे प्रमाण उत्तरेच्या दुप्पट आहे. यामुळे या भागात हंगामातील सोयाबीन, तूर, मका यासह कडधान्य वर्गात मोडणाऱ्या उडीद, तूर, मूग, मटकी या पिकांच्या १०० ते १९२ टक्क्यांर्पत पेरण्या झालेला आहे.

जूनच्या पहिल्याच पंधारवाड्यात जिल्ह्यात दमदार पावसाने सुरूवात केली. मात्र, जूनचा शेवटचा आठवडा आणि जुलैचा पहिला आठवडा काही भागात पावसाने उघडीप दिल्याचे चित्र होते. मात्र, टप्प्याने पेरणी झालेल्या भागात दमदार पावसाने हजेरी लावल्याने यंदा खरीप हंगामाची स्थिती आतापर्यंत चांगली आहे. जिल्ह्यात ३० जूनपर्यंत मूग आणि उडीद कडधान्य पिकांच्या पेरणीचा कालावधी आहे. या काळात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाल्याने कडधान्य पिकांची पेरणी सरासरीपेक्षा अधिक आहे.

हे ही वाचा : तुमचा भंपकपणा आम्ही उघडा करणार; भाजपच्या दरेकरांचा जरांगेंना इशारा

कृषी विभागाच्या नियोजनानूसार दरवर्षी १५ जून ते १५ जुलै हा पेरणीसाठी सर्वोत्तम कालावधी असून यात जिल्ह्यातील बहुतांशी भागातील पेरण्या उकरलेल्या आहेत. मात्र, यंदा अकोले तालुक्यात भाताची लागवड ५० टक्क्यांच्या आत आहे. तर कपाशी लागवडीचे क्षेत्र हे दीड लाखांच्या टप्प्यावर पोहचले असून लागवडीची सरासरी ११८ टक्क्यांपर्यंत वाढलेली आहे. त्याच सोबत उत्तर जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने आणि धरणात पुरेसा पाणी साठा नसल्याने नवीन ऊस लागवडीचे प्रमाण हे अवघे १२ टक्क्यांवर असून जिल्ह्यात नव्याने ११ हजार हेक्टरवर नवीन ऊस लागवड झालेली दिसत आहे. अकोले तालुक्यात पावसाचे असणारे प्रमाण यंदा काहीसे कमी असल्याचे दिसत आहे. यामुळे दरवर्षी १५ ऑगस्टला भरणारे भंडारदरा धरण यावर्षी भरणार की मुहूर्त हुकणार हे आताच सांगता येणे कठीण आहे.

पीकनिहाय झालेली पेरणी

भात ८ हजार ४०२ हेक्टर (४९ टक्के), बाजरी ६९ हजार १४४ हेक्टर (४६ टक्के), मका ७९ हजार ३५२ (१३१ टक्के), तूर ७० हजार हेक्टर (१९३ टक्के), मूग ४९ हजार ६२४ हेक्टर (१०६ टक्के), उडिद ६१ हजार हेक्टर (१५१ टक्के), सोयाबीन १ लाख ५७ हजार ७३६ हेक्टर (१८१ टक्के), कापूस १ लाख ४३ हजार २३५ हेक्टर (११८ टक्के) अशी पेरणी झालेली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या