मुंबई | Mumbai
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी मोठा ट्विस्ट आला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत असलेल्या मिलिंद नार्वेकर, प्रसाद लाड आणि विहंग सरनाईक यांनी अर्ज माघारी घेतल्याने विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे अजिंक्य नाईक पुन्हा एकदा एमसीएचे अध्यक्ष झाले आहे.
एमसीएच्या अध्यक्षपदासाठी आमदार जितेंद्र आव्हाड, प्रसाद लाड, मिलिंद नार्वेकर, शाह आलम शेख, डायना एडलजी, विहंग सरनाईक आणि सूरज सामंत यांनी अर्ज भरला होता. मात्र, या सर्वांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत. आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव आणि खजिनदार या पदांसाठी निवडणूक होणार आहे.
अजिंक्य नाईक पुन्हा एकदा अध्यक्षपदी
एमसीएच्या अध्यक्षपदी असताना अमोल काळे यांचे निधन झाल्याने अजिंक्य नाईक अध्यक्ष झाले होते. अजिंक्य नाईक आता पुन्हा एकदा बिनविरोध अध्यक्ष झाले आहेत. अजिंक्य नाईक २३ जुलै २०२४ रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले होते. नाईक यांनी वयाच्या ३८ व्या वर्षी अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळवला होता. त्यावेळी अजिंक्य नाईक यांनी संजय नाईक यांचा पराभव करत विजय मिळवला होता.
अजिंक्य नाईक यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केली होती त्या शाह आलम शेख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाचा अर्ज माघारी घेतला. शाह आलम शेख यांनी सेक्रेटरी पदाचा अर्ज ठेवला आहे. अध्यक्षपदासाठी अर्ज अजिंक्य नाईक यांना भरता येणार नाही असे त्यांच म्हणणे होते.
एमसीएच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या सर्व उमेदवारांनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने अजिंक्य नाईक यांना पुन्हा अध्यक्षपद मिळाले आहे. पडद्यामागे बऱ्याच घडामोडी घडल्याचे दिसून आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एमसीएचं अध्यक्षपद भूषवलेले शरद पवार आणि आशिष शेलार यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. रविवारी रात्रीपासूनच सर्व घडामोडी सुरू होत्या. तिन्ही नेते एकमेकांशी संपर्कात होते. या नेत्यांनी सामंजस्यपणे पावले उचलण्याचे ठरवले असे सांगण्यात येत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




