मुंबई | Mumbai
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे बारामती विमानतळावर आज (बुधवारी)सकाळी घडलेल्या भीषण विमान अपघातात मृत्यू झाला. अजित पवार यांच्यासह या भीषण विमान अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. अजितदादांच्या अकाली निधनाने संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त होत असून सर्वजण शोकसागरात बुडाले आहेत. या दु:खद घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह दिग्गजांनी नेत्यांनी त्यांना सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की,” महाराष्ट्राकरिता आजचा दिवस अतिशय कठीण असा दिवस आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी ते अत्यंत महत्वपूर्ण योगदान देत होते. महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असलेला नेता आज हरपला. दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला. त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. मी आणि एकनाथ शिंदे लवकरच बारामतीच्या दिशेनं निघणार आहोत. अजितदादांचे निधन मनाला चटका लावणारे आहे”, अशी दु:खद भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.
मनाला वेदना देणारी आणि चटका लावून जाणारी घटना – उपमुख्यमंत्री शिंदे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले की, “मनाला वेदना देणारी आणि मनाला चटका लावून जाणारी अतिशय दुर्दैवी घटना आज महाराष्ट्रात घडली आहे. हे खरंतर कोणाच्या स्वप्नातही वाटलं नसेल, अजितदादा एवढ्या लवकर आपल्यातून जातील ही महाराष्ट्रासाठी अतिशय दुःखद आणि दुर्दैवी घटना आहे. अजितदादा गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणाचे नेतृत्व करत होते, अतिशय परखड स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे, प्रत्येक गोष्टीचा त्यांना बारीक गोष्टीचा अभ्यास करून बोलण्याची सवय होती, परखड स्पष्टपणा आणि निर्भीडपणे, रोखठोकपणे बोलणारे असले तरीसुद्धा चूक त्याला चूक आणि बरोबर त्याला बरोबर असे म्हणणारे ते होते, ते मनाने अतिशय निर्मळ होते, त्याचा अनुभव मी घेतला आहे, असंही त्यांनी म्हटले.




