राहाता |प्रतिनिधी| Rahata
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (DCM Ajit Pawar) यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन राज्याच्या हिताचा विचार करणारा एक खंबीर सहकारी आणि जिवलग मित्र आज आपण गमावला आहे, अशा भावपूर्ण शब्दांत राज्याचे महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांच्या अकाली जाण्याने राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची कधीही भरून न निघणारी हानी झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना ना. विखे पाटील म्हणाले, गेली अनेक वर्षे विधिमंडळात आणि मंत्रिमंडळात आम्हाला एकत्र काम करण्याची संधी मिळाली.
राज्याच्या विकासाचे अनेक महत्त्वाचे निर्णय आम्ही एकत्रित बसून घेतले. कामात प्रचंड वक्तशीरपणा आणि प्रशासकीय शिस्तीला दादांचे नेहमीच प्राधान्य असायचे. समोरचा व्यक्ती सत्तेतील आहे की विरोधी पक्षाचा, याचा विचार न करता केवळ कामाच्या गुणवत्तेवर सहकार्य करण्याची त्यांची भूमिका आदर्शवत होती. अहिल्यानगर जिल्ह्याच्या आणि विशेषतः लोणी (Loni) परिसराच्या विकासात दादांचे नेहमीच सहकार्य लाभले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत लोणी बुद्रुक येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि खासदार साहेबांच्या पुतळा अनावरण समारंभास अजितदादा उपस्थित होते.
तो क्षण आमच्या परिवारासाठी सदैव स्मरणात राहणारा आहे, अशी आठवणही त्यांनी यावेळी सांगितली. दादांचा स्वभाव स्पष्टवक्ता असला तरी, ते मनाने अतिशय प्रेमळ होते. सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. सकाळी लवकर कामाला सुरुवात करून रात्री उशिरापर्यंत झटणारा असा लोकनेता आज आपल्यातून निघून गेला, हे दुःख मोठे आहे, असे सांगत डॉ. विखे पाटील (Guardian Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.




