राजगुरु नगर | RajGuru Nagar
राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. आता प्रचाराला अवघे काही तास उरले असल्यामुळे नेत्यांची धावपळ सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी एकच हशा पिकवला.
माझं पार टक्कल पडलय तरी लोक मला शिकवताय
राजगुरुनगर येथील भरसभेत अजित पवारांनी बाबा लोकांचे ऐकावे लागते. कोणत्या बाबा लोकांचे ते तुम्ही ठरवा, असे मिश्किल विधान अजित पवारांनी केलेय. राजगुरुनगर येथील सभा सुरु असताना अजित पवारांना बाबा राक्षे हे काही मुद्दे देत असताना “होय होय बाबा होय. आता हा मला शिकवायला चाललाय, आता असं बोला, आता तसं बोला. माझं पार टक्कल ना टक्कल पडलंय. तरी मला लोक शिकवतायत. आता काय करू या बाबाला. बाबा लोक अशीच असतात. सगळं बाबा लोकांचं ऐकावं लागतं. आता कुठल्या बाबा लोकांचं ऐकावं लागतं, याचा विचार तुम्ही करा”, असे मिश्किलपणे अजित पवार यांनी म्हटले आहे.
७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला
मी कामाचा माणूस आहे, माझी प्रशासनावर पकड आहे. मात्र काही लोकं माझ्यावर आरोप करतात. मी असा आहे, तसा आहे, 70 हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. पण मी एक रुपयांचा मिंदा नाही. तुम्ही दाखवून द्या, की मी कामं करताना कोणाकडून पैसे घेतले किंवा चिरीमिरी द्यावी लागली. उलट प्रशासन मला टरकून राहतात, असं वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केलं.
तिजोरीच्या चाव्या माझ्या हातावरुन सारवासारव
“तुम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदान करा, तुमच्या भागाला निधी कमी पडू देणार नाही. तुमच्या हातात मत आहे, तर माझ्या हातात निधी आहे.” त्यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीही म्हटलं होतं की, “अजित पवारांच्या हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला मतदान केल्यास निधी मिळेल.”
त्यानंतर मात्र अजित पवारांनी आपल्या वक्तव्यावरुन सारवासारव केल्याचे पहायला मिळाले. “मी परवा कुठेतरी बोलताना म्हणालो की तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आहेत. पण तो बोलण्याचा भाग होता. शेवटी जनता जनार्धन सर्व काही असतात. लगेच बाकीच्यांनी सांगितलं की चावी तुच्याकडे आहे, पण तिजोरी आमच्या खोलीमध्ये आहे. आरे पण कोणाच्याही खोलीत तिजोरी असूद्या, काय करायचंय? राज्याच्या जनतेची तिजोरी आहे. माझ्या बापाची पण नाही आणि इतरांच्याही बापाची नाही, ही गोष्ट खरी आहे. मी बोलता बोलता ओघात बोलून गेलो. त्यानंतर लगेच मीडिया आणि बातम्या. पण माझ्याकडे जो काही अधिकार आहे तो आहेच आणि माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहेत, हे देखील मी मान्य करतो. माझ्याकडे जो अधिकार आहे, त्या आधारावर विकासाला मदत करणं हे माझं कर्तव्य आहे.”
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





