मुंबई | Mumbai
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात निधन झाले. अजित पवार हे कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेले नेते होते. त्यांनी नेहमीच नागरिकांच्या समस्यांना प्रथम प्राधान्य दिले आहे. अपघातापूर्वी काही मिनिटांआधीच अजित पवार यांनी एका कार्यकर्त्याला फोन केल्याचा दावा करण्यात आला आहे.
अजित पवार यांचा विमान अपघात झाला, त्याच्या काही वेळे आधी म्हणजेच सकाळी 8 वाजून 37 मिनिटांनी त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते श्रीजीत पवार यांना फोन केला होता. श्रीजीत यांनी एका विशिष्ट समाजाला उमेदवारी देण्याबाबत दादांना मेसेज केला होता, त्याला उत्तर देण्यासाठी दादांनी विमानातूनच त्यांना संपर्क साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी फोनद्वारे साधलेला शेवटचा संवाद काय होता, हे सर्वांना ऐकवण्यात आला. अजित पवार यांचे चुलत पुतणे श्रीजीत पवार यांच्याशी त्यांचा संवाद झाला. त्यावेळी अजित पवार यांनी काय म्हटले, याची ऑडिओ क्लिप ऐकवण्यात आली.
श्रीजीत पवार काय म्हणाले?
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शेवटचा संवाद पुढे आणत असल्याचा दावा अजित पवार यांचे चुलत पुतणे श्रीजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. श्रीजित पवार यांनी त्यांना मेसेज केला होता, यावेळी केलेल्या तक्रारीवर अजितदादांनी त्यांना फोन केला आणि म्हणाले की, आम्ही सर्व जातीधर्माला सोबत घेऊन जाणारे आहोत. अजित पवार हे महाराष्ट्राच्या गावगाड्यातील जनतेची कामे करणारे लोकनेते होते. आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले. श्रीजित पवार यांच्याशी फोनवर संवाद झाला होता. त्या फोन कॉलवरील संभाषण आता समोर आले आहे.
अजित पवार काय म्हणाले?
तुम्हाला काही माहिती नसतं… काही नसतं.. बाळा, आपण सगळ्या जातीधर्माला सोबत घेऊन जातो. सुप्यात माळी समाजाला आपण उमेदवारी दिली. इतर ठिकाणीदेखील ओबीसी उमेदवारांना पण संधी दिली. इतर पक्षांनी उमेदवारी दिली नाही, असे अजित पवारांनी म्हटले.
श्रीजीत पवार हे रेकॉर्डिंग ऐकवताना भावूक झाले होते. ते म्हणाले, “दादांना कोणीही मेसेज केला तरी ते त्याचे उत्तर द्यायचे. विमान प्रवासात असतानाही त्यांनी माझ्या शंकेचे निरसन करण्यासाठी फोन केला. जगाला कळावं की हा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन चालणारा होता, म्हणूनच मी हे रेकॉर्डिंग समोर आणलं आहे.”





