Sunday, July 7, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPM Modi Swearing Ceremony : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही?

PM Modi Swearing Ceremony : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही?

फडणवीसांकडून मनधरणीचा प्रयत्न

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

आज देशात नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित एनडीएचे सरकार स्थापन होणार असून संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांना पीएमओ कार्यालयाकडून फोनाफोनी सुरू आहे. यात महाराष्ट्रातून भाजपकडून नितीन गडकरी, पियूष गोयल, मुरलीधर मोहोळ, रक्षा खडसे यांना फोन गेला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे. मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कुठल्याही खासदाराला मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही. त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.

नव्या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या (Union Cabinet) शपथविधीत मंत्रिपदासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून (Ajit Pawar NCP) राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांना अजून पीएमओ कार्यालयातून मंत्रिपदासाठी फोन आलेला नाही. त्यामुळे आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार वेटिंगवर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

तसेच मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजप (BJP) एनडीएमधील घटकपक्षांना एकीकडे सन्मानाने संधी देत आहे. तर दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र एकही मंत्रिपद मिळणार नसल्याची चिन्हे दिसत आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाच जागांवर निवडणूक लढवली होती. परंतु, केवळ एकाच जागेवर पक्षाचा विजय झाला आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना मंत्रिपद नाकारले जात आहे का? अशी शंका राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहेत.

दरम्यान, नुकतीच सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या निवासस्थानी प्रफुल्ल पटेल, अजित पवार, धनंजय मुंडे, छगन भुजबळ यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक पार पडली. मात्र, या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे आता या दोघांपैकी कुणाला पीएमओ कार्यालयातून मंत्रिपदासाठी फोन येतो हे बघणे महत्वाचे असणार आहे.

फडणवीसांकडून मनधरणीचा प्रयत्न

अजित पवार गटाला पहिल्या शपथविधी सोहळ्यात एकही मंत्रीपद देण्यात येणार नसून त्यासाठीच अजित पवारांची मनधरणी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सुनील तटकरेंच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले होते असे सांगितले जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाकडून चार जागांवर निवडणूक लढवण्यात आली. मात्र, त्यापैकी फक्त एकच जागा पक्षाला जिंकता आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या