कोतूळ |वार्तहर| Kotul
अहिल्यानगर जिल्ह्याची जिवनदायिनी असलेल्या मुळा धरणाच्या अकोले तालुक्यातील पाणलोटात जोरदार पाऊस सुरू असल्याने मुळा नदी उगम परिसरात असणारे आंबित धरण काल रविवारी 27 जून रोजी सकाळी ओव्हरफ्लो झाले. गत वर्षाच्या तुलनेत हे धरण तब्बल महिनाभर उशीरा भरले आहे. मागील वर्षी हे धरण 27 मे रोजी तुडूंब झाले होते.
यावर्षीच्या पावसाळ्यात जिल्ह्यात प्रथमच ओव्हरफ्लो होण्याचा मान या धरणाला मिळाला आहे. या धरणाची साठवण क्षमता 193.97 दलघफू आहे. या धरणातून सुमारे 200 क्युसेकने विसर्ग मुळा नदी सुरू होता. हा विसर्ग कोतूळजवळील पिंपळगाव खांड धरणाच्या दिशेने झेपावला आहे. पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास दोन-तीन दिवसांत हे धरणही निम्मे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, या हंगामात पहिल्यांदाच मुळा पाणलोटात पावसाने बर्यापैकी जोर धरला आहे. त्यामुळे डोंगरदर्यांवरील धबधबे सक्रीय झाले असून ओढेनाले खळखळू लागले आहेत. हरिश्चंद्र गड, पाचनई, आंबित हा भाग धुक्याने लेपाटून गेला असून शेतामध्ये आता पाणी खेळू लागले आहे. या पावसामुळे भातरोपे तरारली असून अन्य पिकांनाही लाभ होत आहे.
भंडारदरा पाणलोटातही पावसाचा जोर वाढला
भंडारदरा वार्ताहराने कळविले की, भंडारदरा धरण पाणलोटात काल रविवारी दिवसभर अधूनमधून रिपरिप सुरू होती. पण रात्री 8 वाजेनंतर पावसाने काहीसा जोर धरला होता. त्यामुळे डोंगरदर्यांवरील धबधबे जोमाने वाहु लागले असून आढेनाले खळखळत धरणाच्या पोटात विसावू लागले आहे. या पावसामुळे आज धरणात बर्यापैकी नवीन पाण्याची आवक होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पाणलोटातील रतनवाडी आणि घाटघर वगळता अन्यत्र पावसाचा जोर नसल्याने काल सायंकाळपर्यंत धरणात अत्यंत धिम्या गतीने पाण्याची आवक होत होती. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल सायंकाळी पाणीसाठा 22 टक्क्यांवर आला होता. काल दिवसभरात केवळ 4 दलघफू नवीन पाण्याची आवक झाली. निळवंडेत अजूनही नवीन पाण्याची आवक सुरू झालेली नाही. दरम्यान, गत चार पाच दिवसांपूर्वी भंडारदरात जोरदार पाऊस झाला होता. पण दुसर्याच दिवशी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धरणात येणारी आवकही मंदावली. सक्रीय झालेले धबधबे आणि खळखळणाचे ओढे नालेही आता कमी प्रमाणात वाहू लागले आहेत. काल रविवारी पावसाळी वातावरण टिकून होते.
कुकडी समूह धरणात नवीन पाण्याची आवक सुरू
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्याला लाभदायी असलेल्या कुकडी समूह धरणांमध्ये गत दोन दिवसांपासून पावसास सुरूवात झाली असून धिम्या गतीने नवीन पाण्याची आवक होत आहे. काल 10.79 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे धरणांमधील एकूण पाणीसाठा1482 दलघफू म्हणजे केवळ 5 टक्के आहे. गतवर्षी याकाळात हाच पाणीसाठा 7368 दलघफू (24.83 टक्के) होता. या समूहातील सर्वात मोठे धरण डिंभे या धरणात केवळ 2.72 टक्के पाणीसाठा आहे. पाणलोटात मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे.




