अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
कधीकाळी एकत्रित शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणार्या नगर शहरात राष्ट्रवादी अजित पवार गटाने आता जोरदार मुसंडी मारली आहे. यंदाच्या महापालिकेत नगरसेवकांच्या 68 जागांपैकी 70 टक्के म्हणजे सुमारे 50 जागाही कमी पडतील अशी स्थिती राष्ट्रवादी अजितदादा गटाची आहे.
नगर शहराचे आ. संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीनंतर स्वीकारलेली हिंदुत्वाची भूमिका त्यांच्यासह त्यांच्या पक्षाला स्व बळावर मनपात सत्ता देण्याइतपत सक्षम दिसू लागली आहे. मनपा लढवू इच्छिणार्यांची खानेसुमारी पक्षाने रविवारी (दि. 2) केल्यावर 68 जागांसाठी तब्बल 250 वर इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज केले आहेत. विशेष म्हणजे आ. जगतापांनी मुस्लिमांविरोधात भूमिका घेऊनही अनेक मुस्लिम इच्छुकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळण्यासाठी अर्ज केले आहेत.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजितपवार यांच्या उपस्थितीत आज मंगळवारी (दि. 4) मुंबईत मनपा आढावा बैठक होणार असून यात नगरचे पदाधिकारी महायुतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाला किमान 50 टक्के जागा मागण्याची शक्यता आहे. तसे झाले तर मित्रपक्ष भाजप व शिंदे सेनेची उर्वरित 50 टक्क्यात बोळवण होण्याची शक्यता आहे. नगर महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटाने निवडणूक तयारीमध्ये आघाडी घेतली आहे. रविवारी 17 प्रभागातील 68 जागांसाठी इच्छूकांचे अर्ज मागविण्यात आले. यावेळी 68 जागांसाठी तब्बल 250 हून अधिक अर्ज दाखल झाले असून अन्य पक्षातील इच्छूकांनी देखील राष्ट्रवादीकडे उमेदवारी मागणी केल्याचे सांगण्यात आले. आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृह येथे इच्छुकांची अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती.
दुपारी 2 वाजेपर्यंत इच्छुकांकडून अर्ज दाखल करण्यात येत होते. यावेळी केवळ अर्ज दाखल करण्यासाठी इच्छूकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. प्रभाग क्रमांक 17 ते 1 अशा उतरत्या क्रमाने प्रभागनिहाय इच्छूकांचे अर्ज स्वीकारण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर उपस्थित होते. महापालिका निवडणुकीसाठी इच्छूकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे निवडणूक राष्ट्रवादी स्व बळावर लढणार असा त्याचा अर्थ होत नाही. महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरे जाणार आहे. शहरात सहमती एक्सप्रेस चालू आहे. शहरात नवे काही करण्यासाठी वेळ देणारा, कामांची आवड असणार्यांनी उमेदवारी देण्याचा प्रयत्न राहिला पाहिजे, असे मत आ. संग्राम जगताप यांनी यावेळी व्यक्त केले. इच्छूकांनी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यात पक्षासह अन्य पक्षांतील इच्छूकांचा समावेश आहे.




