अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेने एप्रिल ते जून या सर्वसाधारण कर सवलत कालावधीत तब्बल 27 कोटी 27 लाख रूपयांची विक्रमी कर वसुली करून नवा आर्थिक टप्पा पार केला आहे. एकूण 39 हजार 518 मालमत्ताधारकांनी यंदा दिलेल्या सवलतीचा लाभ घेत कर भरणा केला. दरम्यान, ज्या नागरिकांनी अजून कर भरलेला नाही, त्यांच्यावर 1 जुलैपासून दरमहा 2 टक्के दंडात्मक शास्ती आकारली जाणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले आहे.
महानगरपालिकेने यंदा कर वसुलीसाठी विविध जनजागृती मोहिमा राबविल्या. एप्रिल व मे महिन्यांत कर भरल्यास 10 टक्के सवलत देण्यात आली होती, ज्याचा 23 हजार 478 नागरिकांनी लाभ घेतला. त्यानंतर जून महिन्यात 8 टक्के सवलतीचा लाभ घेत 16 हजार 40 मालमत्ताधारकांनी कर भरणा केला. या काळात एकूण 28.13 कोटी रूपयांची कर रक्कम जमा झाली असून, यामध्ये 86.32 लाख रूपयांची सवलत दिली गेली.
त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत प्रत्यक्षात 27.27 कोटी रूपयांचा कर भरणा झाला आहे. आयुक्त डांगे यांनी सांगितले की, मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 3 कोटींनी अधिक कर वसूल झाला आहे. याआधी 22 कोटी व 24 कोटींच्या वसुलीची नोंद झाली होती. त्यामुळे यंदाची कामगिरी ऐतिहासिक ठरली आहे.
कर भरण्याचे आवाहन
ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप कराचा भरणा केलेला नाही, त्यांच्यावर महिन्याला 2 टक्के दराने दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे शास्तीची रक्कम वाढण्यापूर्वी तात्काळ कर भरणे हितावह ठरेल. लवकरच मोठ्या थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले.




