नवी दिल्ली –
नवे कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत शेतकर्यांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली आहे. दरम्यान, नवे कृषी कायदे रद्द करण्यावर
शेतकरी ठाम असून गृहमंत्र्यांनी एक तर हो म्हणावं किंवा नाही, मधला मार्ग नाही असे शेतकर्यांनी सांगितले आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वेबसाईटने दिले आहे.
दरम्यान, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचे आज देशात ठिकठिकाणी पडसाद उमटले. सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं शेतकर्यांनी काल भारत बंदचा नारा दिला होता. भारत बंदनंतर बुधवारी सरकारसोबत चर्चेची सहावी फेरी पार पडणार आहे. त्यापूर्वीच अमित शाह यांनी शेतकरी नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीतून तोडगा निघणार का?, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. दरम्यान, ही बैठक गुप्त ठिकाणी सुरू होती.
भारत बंदबरोबर शेतकरी आंदोलनानं तीव्र स्वरूप धारण केलं आहे. देशभरात भारत बंद पाळण्यात आल्यानंतर आता सरकार आणि शेतकर्यांच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मात्र, उद्याच्या बैठकीपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
अचानक ही बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत तिन्ही कृषी विधेयकासंदर्भात महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे. भारतीय किसान यूनियनचे राकेश टिकैत यांनी या बैठकीविषयी माहिती दिली आहे.