नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेला हल्ला आणि त्यानंतर भारतीय सैन्यदलाने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबत लोकसभेमध्ये (पावसाळी अधिवशन) प्रदीर्घ चर्चा चालू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज (२९ जुलै) या चर्चेत सहभाग घेतला. यावेळी त्यांनी विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली. लोकसभेत बोलत असताना अमित शाह यांनी जवाहरलाल नेहरुंचा उल्लेख करत एक वक्तव्य केले. काँग्रेसवर टीका करताना शाहांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधींचे निर्णय चुकले असा आरोप करत काँग्रेसला लक्ष्य केले.
अमित शाह नेमंक काय म्हणाले?
यावेळी अमित शाह म्हणाले, “भारताचे पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच आज पाकव्याप्त काश्मीरचे अस्तित्व आहे. १९४८ च्या भारत-पाक युद्धावेळी नेहरुंनी एकतर्फी युद्धविराम जाहीर केला नसता तर आज वेगळी परिस्थिती असती. दहशतवादाची पाळेमुळे ही पाकिस्तानात आहेत. जर काँग्रेसने देशाची फाळणी स्वीकारली नसती तर आज हे सर्व घडले नसते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु यांनी पीओके, अक्साई चीनवर पाणी सोडले, त्यामुळे आज हे भोगावे लागत आहे, असा आरोप अमित शहांनी केला.”असे अमित शाह म्हणाले.
अमित शाह म्हणाले, “विरोधक सातत्याने आम्हाला प्रश्न विचारत आहेत की आपण सुस्थितीत होतो, तर पाकिस्तानबरोबर युद्ध का केले नाही? मला त्यांना सांगायचे आहे की युद्धाचे अनेक परिणाम होतात. खूप विचार करून असे निर्णय घ्यावे लागतात.”
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “युद्ध का केले नाही विचारणाऱ्यांना मी या देशाच्या इतिहासातील काही उदाहरणे देऊ इच्छितो. १९४८ साली भारत–पाकिस्तान युद्ध झाले. त्या युद्धात आपल्या लष्कराने आघाडी घेतली होती. आपले लष्कर काश्मीरमध्ये अशा स्थितीत होते जिथून आपण पाकिस्तानमध्ये घुसू शकलो असतो. परंतु, आपले तत्कालीन पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी युद्धविराम जाहीर केला. आपले तत्कालीन गृहमंत्री दिवंगत वल्लभभाई पटेल नेहरूंना थांबवत होते. परंतु, नेहरूंनी पटेलांचे ऐकले नाही. नेहरूंनी एकतर्फी युद्धविराम जाहीर करून टाकला. “
सोमवारी झालेल्या चर्चेवेळी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी पाकिस्तानसोबत युद्ध सुरु केले होते तर पीओके ताब्यात का घेतले नाही, असा सवाल केला होता. त्यांना प्रत्युत्तर देताना अमित शहा म्हणाले की, मी इतिहासाचा विद्यार्थी आहे. जबाबदारीने सांगतो. पाक व्याप्त काश्मीरचे अस्तित्व आहे तर ते फक्त नेहरूंमुळेच आहे. नेहरूच त्याला जबाबदार आहे. १९६० मध्ये पटेलांनीही विरोध केला होता. त्यावेळी सिंधूच्या भौगोलिक आणि जलनीतीवर आपण मजबूत होतो. पण त्यावेळी ८० टक्के भारताचे पाणी पाकिस्तानला दिले”, असे अमित शाह म्हणाले.
अक्साई चीन चीनला दिले होते
अमित शहा म्हणाले की, १९६२ मध्ये चीनसोबत युद्ध झाले. तेव्हा ३० हजार चौरस किलोमीटर अक्साई चीन चीनला दिले होते. तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरु म्हणाले होते की, त्या जागेवर गवत सुद्ध उगत नाही. नेहरुंनी आसामलाही बाय-बाय केले होते. यावर काँग्रेस खासदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावर शहा म्हणाले की, अमेरिकेने भारताला सुरक्षा परिषदेमध्ये घेण्याचा प्रस्ताव दिला होता. तेव्हा पंडित नेहरु म्हणाले होते की, चीनसोबतचे आमचे संबंध खराब होतील. यामुळे चीनला वाईट वाटेल. आज चीन आतमध्ये आहे आणि आपण बाहेर आहोत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




