संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner
येथील मदिनानगरजवळ असलेल्या काटवनात कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधलेल्या नऊ गोवंश जनावरांची सुटका संगमनेर शहर पोलिसांनी नुकतीच केली असून ही जनावरे सायखिंडी येथील पांजरपोळमध्ये पाठविण्यात आली आहे. याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील मदिनानगरजवळ असलेल्या काटवनात अदनान आसिफ कुरेशी (रा.खाटिक गल्ली, मोगलपुरा) याने मंगळवारी (दि.7) सायंकाळी कत्तल करण्याच्या उद्देशाने नव्वद हजार किमतीची नऊ गोवंश जनावरे निर्दयतेने व अन्न पाण्याविना बांधून ठेवली असल्याची माहिती गुप्त खबर्यामार्फत पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना समजली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, फराहनाज पटेल, पोकॉ. आत्माराम पवार, विशाल कर्पे आदी पोलिसांनी वरील ठिकाणी छापा टाकत नऊ गोवंश जनावरांची सुटका केली.
याप्रकरणी पोकॉ. विशाल कर्पे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अदनान कुरेशी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बंडू टोपे करत आहेत. शहरातील विविध भागात बेकायदेशीर चालणार्या कत्तलखान्यांवर वारंवार कारवाया होत आहे. मात्र असे असताना देखील कत्तलखाने बंद होत नसून छुप्या पद्धतीने ते सुरू आहे. मग कत्तल केलेल्या गोमांसाची अलिशान कारमधून देखील वाहतूक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे शहरात सुरू असलेले कत्तलखाने कधी बंद होणार आहेत? असा सवालही नागरिक करू लागले आहेत.