नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व किसान सभेच्यावतीने शेतकरी विरोधी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात सदर कायद्याच्या प्रती जाळून 5 जून हा इशारा दिवस पाळणार असून त्याच दिवशी सकाळी 9.30 वाजता भेंडे बुद्रुक येथे बसस्थानक चौकात शेतकरी विरोधी कृषी कायद्याची होळी करणार असल्याची माहिती किसान सभेचे राज्य सचिव कॉ. बन्सी सातपुते यांनी दिली.
अधिक माहिती देताना कॉ. सातपुते म्हणाले, 5 जून 2020 रोजी मोदी सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते. या अध्यादेशाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेसहित सर्व शेतकरी समर्थक संघटना व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती यांनी राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केले. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी विरोधी तीनही कायदे रद्द करा, कृषी निविष्ठा, बी-बियाणे, औषधे जीएसटी मुक्त करा, हमी भावासाठी कायदा करा, डिझेल पेट्रोल वरील अबकारी कर कमी करून त्याचे भाव कमी करा, कांदा ,बटाटा व इतर कृषी मालाला किमान हमी भाव जाहीर करा या आणि इतर मागण्यांसाठी कृषी कायद्यांच्या प्रती जाळून 5 जून इशारा दिवस पाळला जाणार आहे. आंदोलनात शेतकर्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन कॉ.बाबा आरगडे, कॉ.अप्पासाहेब वाबळे कॉ.दत्ता देवरे कॉ. भारत आरगडे, गणेश खरात, बाबासाहेब सोनपुरे, दत्ता गोंधळी आदींनी केले आहे.