श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी 277 भरण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांपैकी 49 उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले असून 194 उमेदवारी अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. सलग तीन वर्ष ऊस कारखान्याला घातला नाही म्हणून उपविधीप्रमाणे किशोर बकाल (पाटील), अॅड. सर्जेराव कापसे तसेच खिर्डीचे सरपंच प्रभाकर कांबळे यांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जी.जी.पुरी यांनी सांगितले. या विरोधात हे तिघेही नगरच्या प्रादेशिक सह. संचालक (साखर) यांच्याकडे अपिल करणार असल्याचे किशोर बकाल यांनी सांगितले.
छाननीत या तिघांसह 49 जणांचे उमेदवारी अर्ज नामंजूर करण्यात आले. परंतु आम्हाला जी उपविधी( नियमावली) देण्यात आली त्यानुसार आमचा अर्ज नामंजूर करता येणार नाही, असे या तिघांच्यावतीने अॅड. अजित काळे यांनी बाजू मांडत निवडणूक अधिकार्यांनी त्यांच्याकडे असणार्या उपविधीप्रमाणे निकाल न देता वकीलांकडे असणार्या उपविधीप्रमाणे निकाल दिल्याचे त्यांचे म्हणणे होते.
या विरोधात नगर साखर सह. संचालकांकडे अपिल करणार असल्याचे या तिघांनी सांगितले. कारखान्याच्यावतीने अॅड. लटमाळे यांनी उपविधी दाखवून 5 वर्षांत सलग तीन वर्षे ज्यांचा ऊस नाही त्यांचे अर्ज नामंजूर करण्याचा युक्तीवाद केला. तो ग्राह्य धरत निवडणूक अधिकारी पुरी यांनी या तिघांचे अर्ज नामंजूर केले
आम्ही 10.11.21 रोजी कारखान्याकडे पैसे भरून उपविधी (पुस्तीका) खरेदी केली होती. त्यामध्ये अशा प्रकारचा नियम नसल्याचे शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले यांनी सांगितले.