संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
प्रशासकीय सोयीच्या नावाखाली तालुक्याची मोडतोड करण्याचा सत्ताधार्यांचा कुटील डाव आहे. याला संगमनेर तालुक्यातून प्रखर विरोध होत असून 62 पैकी 42 गावांनी ग्रामसभा घेऊन हा अन्यायकारक प्रस्ताव तातडीने रद्द करावा, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे. अखंड संगमनेर तालुका कृती समितीच्यावतीने आश्वी बुद्रुक येथील प्रस्तावित अपर तहसील कार्यालय रद्द करण्याबाबतचे ठराव देण्यात आले आहेत. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकासातून वैभवशाली ठरला आहे.
मात्र काही लोकांना हा विकास पाहवत नसल्याने त्यांनी तालुक्याची मोडतोड सुरू केली आहे. सत्तेचा गैरवापर करून आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी कार्यालयाचा घाट घातला जात आहे. याचे वृत्त समजताच 171 गावे व 258 वाड्या-वस्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. याबाबत विविध निदर्शने व निवेदने देण्यात आली. गावोगावी ग्रामसभा घेण्यात आल्या, तातडीने हा अन्यायकारक प्रस्ताव रद्द करावा, अशी मागणी सर्वत्र सुरू आहे. आश्वी बुद्रुक हे सर्वांच्यादृष्टीने गैरसोयीचे असून शहर हे प्रगतिशील व सोयीचे आहे. शाळा, महाविद्यालये व सर्व कार्यालये एकाच ठिकाणी असून दळणवळणाच्या सोयी आहेत. असे असताना हा नवीन प्रस्ताव का तयार झाला? याचे उत्तर अद्याप सत्ताधार्यांना देता आले नाही.
यामुळे तालुक्यातील सर्व गावांनी अखंड संगमनेर तालुका कृती समिती स्थापन केली असून या माध्यमातून आंदोलन उभारले आहेत. या कार्यालयास चंदनापुरी, वाघापूर, रायते, कोल्हेवाडी, जाखुरी, पिंपळगाव माथा, कोकणगाव, शिवापूर, कोंची, मांची, माळेगाव हवेली, निमज, समनापूर, सुकेवाडी, रहिमपूर, अंभोरे, कोळवाडे, खराडी, निमगाव टेंभी, संगमनेर खुर्द, रायतेवाडी, जोर्वे, खांजापूर, सावरगाव तळ, हिवरगाव पावसा, झोळे, कुरण, शिरापूर, पोखरी हवेली, खांडगाव, निंबाळे, पिंपरणे, वडगाव पान या गावांनी ग्रामसभा घेऊन ठराव दिले आहेत. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब रहाणे, उपाध्यक्ष अरुण गुंजाळ, सचिव रामेश्वर पानसरे आदी उपस्थित होते. हे निवेदन नायब तहसीलदार गिरी यांनी स्वीकारले.