ठाणे | Thane
भिवंडी तालुक्यातील पडघा जवळील बोरिवली गावात आज सकाळी एटीएसने मोठे सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. या ऑपरेशनमुळे संपूर्ण गावात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने आज सकाळी अचानक पडघ्यामध्ये धाड टाकली. या छापेमारीदरम्यान, एटीएसने २००३ च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी आणि सिमी (स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया) या संघटनेचा माजी पदाधिकारी साकिब नाचन याच्या घराचीही झडती घेतली असल्याचे समजते.
२००२-२००३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन विलेपार्ले आणि मुलुंड बॉम्बस्फोटांचा समावेश आहे. या दहशतवादी घटनांमध्ये अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. तर २०१७ मध्ये शिक्षा पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झाला, असा आरोप त्याच्यावर आहे. दरम्यान या कारवाईत आता नेमकी काय आणखी नवी माहिती समोर येते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसकडून सुरू असलेल्या या छापेमारीदरम्यान ८ ते १० संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या त्यांची कसून चौकशी सुरु आहे. या कारवाईत संपूर्ण गावात ४५० ते ५०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर ठाणे ग्रामीण, रायगड आणि ठाणे पोलीस दलातील कर्मचारीही बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
#WATCH | Maharashtra ATS is conducting raids in Padgha, Thane, in connection with a terrorism-related case. One of the locations includes the residence of Saqib Nachan, a former member of the banned outfit Student Islamic Movement of India (SIMI), who was earlier convicted in 2… https://t.co/F6H75vV2LI pic.twitter.com/EKMQPHQymr
— ANI (@ANI) June 2, 2025
नुकतेच मुंबई डॉकयार्डमधील अभियंता-तंत्रज्ञ रविकुमार वर्मा (३५, रा. कळवा, ठाणे) याला दहशतवादविरोधी पथकाने (ATS)गुरुवारी अटक केली. वर्माने भारतीय नौदलाची गोपनीय माहिती एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला पुरवली होती. त्याच्या संपर्कातील आणखी दोन जणांविरोधातही शासकीय गुपिते अधिनियम (ओ.एस.ए.) आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पडघ्यातील बोरिवली गाव साकिब नाचण आणि इतर दहशतवाद्यांचा तळ म्हणून ओळखले जाते. यापूर्वीही या गावातून अनेकदा दहशतवाद संबंधित कारवायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. याच गावातून कुख्यात साकिब नाचण, त्याचा मुलगा आणि इसिसमधील दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या १६ जणांना अटक करण्यात आली होती. तसेच पुणे येथील एका प्रकरणात चार जणांना येथूनच ताब्यात घेण्यात आले होते. त्यामुळे हे गाव सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा