औरंगाबाद – Aurangabad
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या चार महिन्यात राज्यभरात भ्रष्टाचार तसेच अपसंपदेच्या २६० प्रकरणांत कारवाई केली. त्यात औरंगाबाद विभागाने ५८ सापळे रचून ७९ आरोपींवर गुन्हे दाखल केल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या वर्षी लॉकडाउन आणि लॉकडाउननंतर भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात विभागाने कारवाई केली. विभागाने २०२० मध्ये ६६३ गुन्हे दाखल केले. राज्यात २०१९ मध्ये ८९१ कारवाई करण्यात आली. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये कारवाईत घट झाली. मात्र, जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात विभागाची सर्व कार्यालये उघडी होती. तसेच मार्चमध्येही बऱ्यापैकी कार्यालय सुरूच होते. एप्रिल महिन्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र त्यापूर्वी चार महिन्यांत २६० जणांवर भ्रष्टाचार प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले.
राज्यभरात २६० झालेल्या कारवाईपैकी औरंगाबाद विभागाने सर्वाधिक ५८ सापळे रचून ७९ जणांविरोधात गुन्हे दाखल केले. नाशिक विभाग दुसऱ्या स्थानी असून त्या विभागाने ४९ सापळे रचून ६३ जणांवर कारवाई केली. तिसरे स्थान पुण्याला मिळाले आहे. पुण्यात ४५ कारवाईमध्ये ५७ भ्रष्ट लोकसेवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
दोन कारवायांबाबत चर्चा
औरंगाबाद परिक्षेत्रात दोन कारवायांबाबत चर्चा आहे. चिकलठाणा येथील महावितरण ग्रामीण कार्यालयात एक मध्यस्थीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले. मात्र महावितरण कार्यालयातील संबंधित अभियंत्यांवर किंवा लोकसेवकावर कारवाई झाली नाही. तसेच कृषी सहायकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी सहायक पसार झाला असून मध्यस्थीला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाया पूर्ण न झाल्याची चर्चा आहे.
असा आहे राज्यभरातील कारवाईचा तक्ता
परिक्षेत्र सापळे आरोपी
मुंबई – २० ३१
ठाणे – २२ ३०
पुणे – ४५ ५७
नाशिक – ४९ ६३
नागपूर – २३ ३०
अमरावती – २२ २९
औरंगाबाद – ५८ ७९
नांदेड – १९ २८