मुंबई | Mumbai
गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू हे शिवसेना पक्षाच्या कोट्यातून विधान परिषदेवर जाणार, अशी चर्चा होती. ती चर्चा आता खरी ठरण्याच्या मार्गावर असून तसे स्पष्ट संकेत खुद्द बच्चू कडू यांनी दिले आहेत. शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी बच्चू कडू यांच्या नावाची शिवसेनेकडून चर्चा सुरु होती. तसेच विधान परिषदेवर जायचं असल्यास प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करा, अशी अट शिवसेनेने बच्चू कडूंना घातल्याची माहितीही समोर आली होती. या सगळ्या चर्चांनंतर आज बच्चू कडू यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार पक्ष शिवसेना पक्षात विलीन करावा आणि धनुष्यबाणावरच विधान परिषदेवर जावे, असा शिवसेना नेत्यांचा हट्ट आहे किंबहुना त्यांच्यासमोर हीच अट टाकण्यात आल्याची चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरला पत्रकार परिषद घेतली.
तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करू
केवळ आमदारकीसाठी मी कोणता निर्णय घेणार नाही. माझ्यासाठी शेतकरी-दिव्यांग जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. त्यांची कामे होणार असतील तर मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाईन. केवळ आमदारकीसाठी निर्णय घेण्याएवढा बच्चू कडू नालायक नाही, असे ते म्हणाले. फॉर्म माझ्या बॅगेत, विधानपरिषद दिली तर एकनाथ शिंदेंचा पाईक म्हणून काम करु…पण आमच्यासाठी दिव्यांग बांधव आमच्यासाठी महत्वाचे आहे. शेतकरी मजूर आमच्यासाठी आई-वडिलांसारखे आहेत. त्यांच्यासाठी जर एखादी मोठी संघटना, पक्ष त्या मुद्त्याच्या बाजूनं उभा राहत असेल तर मग आता सर्व चर्चेतूनच होईल ना. पण आता चर्चेचा निरोप येतो की नाही हा मोठा प्रश्न आहे’, असाच प्रश्नार्थक सूर आळवला.
माध्यमांमधून विलिनीकरणाच्या प्रस्तावासंदर्भात कळाले
माध्यमांमधूनच मला विलिनीकरणाच्या प्रस्तावासंदर्भात कळाले. फोनवरून मंत्री उदय सामंत यांच्यासोबत बोलणे झाले होते. परंतु त्यात स्पष्टता नव्हती. परंतु त्यांच्या वतीने जसे प्रस्ताव आहेत, तसे आमच्यावतीनेही शेतकरी दिव्यांगांच्या प्रश्नांसंदर्भातील प्रस्ताव आहेत. चर्चेवेळी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे संबंधित प्रस्ताव देईल, असे बच्चू कडू म्हणाले.
पत्रकार परिषदेनंतर फोन आला तर भेटायला जाऊ
विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारीसंदर्भात अजून मला एकनाथ शिंदे यांचा फोन आला नाही, सांगितले गेले नाही. परंतु अर्जाच्या तयारीसाठी फार वेळ लागत नाही. सहा महिन्यांआधी अर्ज केला होता, त्यामुळे त्याची कागदपत्रे बॅगेतच असतात, असेही मिश्किलपणे बच्चू कडू म्हणाले.





