Friday, July 24, 2026
HomeराजकीयBacchu Kadu : कृषिमंत्र्यांच्या रमीप्रकरणावरून बच्चू कडूंचा सरकारला टोला; म्हणाले, "शेतकऱ्यांचा जीवच…"

Bacchu Kadu : कृषिमंत्र्यांच्या रमीप्रकरणावरून बच्चू कडूंचा सरकारला टोला; म्हणाले, “शेतकऱ्यांचा जीवच…”

मुंबई । Mumbai

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळात रमी खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याऐवजी सरकार त्यांचा जीव सट्ट्यावर लावत असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. कोकाटे यांच्या कृतीवर संताप व्यक्त करत विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

पावसाळी अधिवेशनादरम्यान माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्याने सर्वच स्तरांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून मंत्री अधिवेशनात खेळात रममाण असल्याने जनतेचा रोष वाढला आहे.

बच्चू कडू यांनी या प्रकरणावरून सरकारला लक्ष्य केले आहे. त्यांनी एका एक्स पोस्टमध्ये सरकारला “रमी सरकार” संबोधत शेतकऱ्यांचे प्रश्न दुर्लक्षित केल्याचा आरोप केला. “शेतकऱ्यांचा जीवच या सरकारने सट्ट्यावर लावला आहे,” असे तिखट शब्दांत त्यांनी सरकारवर हल्ला चढवला. यासोबतच त्यांनी 24 जुलै रोजी राज्यभरात चक्काजाम आंदोलनाची घोषणा केली आहे.

बच्चू कडू यांच्या चक्काजाम आंदोलनाला अनेक नेत्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. खासदार प्रणिती शिंदे, आमदार सत्यजित तांबे, खासदार बजरंग सोनवणे, आमदार बाबाजी काळे, आमदार प्रकाश सोळंके, खासदार भास्कर भगरे आणि आमदार डॉ. राहुल पाटील यांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे. हे आंदोलन शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार आणि कामगारांच्या मागण्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे.

प्रहार संघटनेने शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे. यापूर्वीही बच्चू कडू यांनी शेतकरी आणि दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी “सातबारा कोरा करा” आंदोलन केले होते. आगामी चक्काजाम आंदोलनात शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमार आणि कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

24 जुलै रोजी होणाऱ्या या चक्काजाम आंदोलनाची जोरदार तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि सरकारच्या नाकर्तेपणाविरोधात हे आंदोलन प्रभावी ठरेल, असा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.विरोधकांचा राजीनामा मागणीचा सूर
कृषिमंत्र्यांच्या रमी खेळण्याच्या कृतीमुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कोकाटे यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. या प्रकरणावर सरकार काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरातून पाणी सोडले, गोदावरीला पूर

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात आषाढसरींचे जोरदार तांडव नृत्य सुरू असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात जोरदार पाण्याची आवक...