मुंबई | Mumbai
काँग्रेसचे नेते व लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजपवर निवडणूक चोरीचा गंभीर आरोप केला आहे.
राहुल गांधी यांनी ईव्हीएम मशीन, निवडणूक आयोग आणि मतदान प्रक्रियेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुन्हा एकदा राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली? अशी विचारणा करत यावर निशाणा साधला. दरम्यान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर संताप व्यक्त केला आहे. डेटाचे अर्धेच विश्लेषण करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, असे त्यांनी सुनावले आहे.
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत खासदार राहुल गांधी यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात पाच महिन्यांत 39 लाख मतदारांची झालेली वाढ ‘संशयास्पद’ असल्याचे राहुल गांधी म्हणतात. पण 2009मध्ये काय झाले होते? एप्रिल 2009च्या लोकसभा निवडणुकीत 7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते, तर, ऑक्टोबर 2009च्या विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 7 कोटी 59 लाख 68 हजार झाली होती. त्यावेळी फक्त महिन्यांत मतदारांची संख्या 30 लाखांनी वाढली होती, याचे स्मरणही चंद्रशेखर बावनकुळे यांनी करून दिले आहे.
त्यावेळी निवडणूक आयोगावर विश्वास होता का? की त्यावेळीही काँग्रेस आणि आयोगामध्ये काही हातमिळवणी होती? त्यावेळी काही गैरप्रकार केला होता का? असे प्रश्न विचारत बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्याकडे उत्तरे मागितली आहेत. 2004 आणि 2009 मध्ये काँग्रेस जिंकल्यावर कोणतेही प्रश्न उपस्थित झाले नाहीत आणि आज जेव्हा काँग्रेसचा पराभव झाला, तेव्हा कांगावा सुरू केला, असा पलटवार त्यांनी केला आहे.
आकडेवारीचे अपूर्ण विश्लेषण करून देशाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका. आपले अपयश लपवण्यासाठी इतरांना दोष देण्याऐवजी, आत्मपरीक्षण करा, असा सल्ला देतानाच महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसला नाकारले आणि आता बिहारमधील जनताही बाहेरचा रस्ता दाखवेल. या भीतीमुळे राहुल गांधी हे आधीच पराभवाचे कारणे तयार करत असल्याचा दावा बावनकुळे यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील जनतेने आमच्या महायुतीला बहुमताने निवडून दिले आहे. जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास पुढील निवडणुकीतही अढळ राहील, असा विश्वास व्यक्त करून चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, वारंवार खोटे बोलून राहुल गांधी राज्याच्या जनादेशाचा अपमान करत आहेत. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही.