बीड | Beed
बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा खून होऊन १६ दिवस उलटले तरी मुख्य आरोपी फरार आहेत. पोलीस आणि सीआयडीच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. पोलीसच आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप विरोधक करत आहे. या पार्श्वभूमीवर आज बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonawane) यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांच्या (Police) तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
यावेळी बोलतांना खासदार सोनवणे म्हणाले की, “सत्ताधारी पक्षाने सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेला कुठेही राजकारण अथवा जातीय वळण देवू नये. संतोष देशमुख सारख्या सोज्वळ मुलाच्या आत्म्याला शांती देण्यासाठी त्या मारेकर्याला फाशीची शिक्षा द्या, हीच माझ्यासह, माझ्या जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री कुणाला करावं, हा सत्ताधारी पक्षाचा विषय असून तिन्ही पक्ष त्याबाबत निर्णय घेतील. मात्र खरंच या प्रकरणाचा तपास करायचा असेल तर अजित पावर यांच्या पक्षाचे जिल्ह्यात तीन आमदार (MLA) आहेत. त्यामुळे अजित पवारांनी या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद स्वीकारावं आणि या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावावा”, अशी मागणी त्यांनी केली.
पुढे ते म्हणाले की, “संतोष देशमुख (Santosh Deshmukh) १० वर्षांपासून राजकारणात आहेत. उत्तम काम करणारा माणूस होता त्याला ठार करण्यात आले. संतोष देशमुख यांची हत्या (Murder) टॉर्चर करुन करण्यात आली आहे हे मी पहिल्या दिवसापासून सांगतो आहे. शवविच्छेदन अहवाल आला त्यात ५६ वण आहेत. त्यात एकावर एक किती झाले असतील? याचा विचार न केलेलाच बरा. डोळ्यांवर, पाठीवर, पोटावर हे वण आहेत. बरगड्या मोडल्या आहेत. त्याचा गुन्हा काय होता? त्याने गावातील वॉचमनला मदत केली ही त्याची एवढी मोठी चूक घडली का? जर पोलीस अधीक्षकांनी वेळीच गुन्हा नोंद केला असता तर कदाचित पुढे गोष्टी घडल्या नसत्या”, असेही खासदार सोनवणे यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, “बीडच्या जनतेचा शासनावर (Government) आता विश्वास उरलेला नाही. आवादा कंपनीने मस्साजोगला काम बंद केले नाही. ६ डिसेंबर या दिवशी आरोपींनी मस्साजोगचे जे आवादा कंपनीचे ऑफिस आहे तिथे अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तिथल्या वॉचमनलाही मारलं गेलं. संतोष देशमुख सरपंच होते. त्यांना या घटनेबाबत सांगण्यात आलं. सरपंच संतोष देशमुख यांनी गावातील व्यक्तीला मदत करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनाही मारहाण करण्यात आली. लोक मधे पडले, त्यांनी वाद सोडवला. सोनवणे नावाचा जो गार्ड होता त्याने जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून पोलिसात तक्रार करायला गेला. त्याला चार तास बसवून ठेवलं आणि थातुरमातुर तक्रार दाखल केली. सदर आरोपींना ९ तारखेला अटक दाखवून जामीन मंजूर केला. यासाठी ६ डिसेंबरला कुणाचा फोन (Phone) आला होता? हे तपासणे गरजेचे आहे असे खासदार बजरंग सोनवणे यांनी सांगितले.