भंडारदरा, कोतुळ |वार्ताहर| Bhandardara
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा आणि मुळा पाणलोटात आठ दिवसांनंतर काल शनिवारपासून पावसाचे पुनरागमन झाले असून आज रविवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत घाटघरमध्ये 45 मिमी पावसाची नोंद झाली. रतनवाडीतही 18 मिमी पाऊस झाला. काल दिवसभर रिपरिप सुरू होती तर काही वेळ जोरदार सरी कोसळत होत्या.
काल सकाळपर्यंत धरणात 30 दलघफू पाणी जमा झाले. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा सकाळी 9874 दलघफू (89.71टक्के) झाला होता. आवक सुरू असताना सायंकाळी हा साठा 9903 दलघफूवर पोहचला होता. निळवंडेतील पाणीसाठा 7208 दलघफू होता. पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्याचा तीन-चार दिवसांत धरणातून पाणी सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सलग सुटट्या आल्याने भंडारदरा पाणलोतील फुललेले सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. कोतुळ वार्ताहराने कळविले की, काल शनिवारी दुपारी 4 वाजल्यापासून पाणलोटात नूर बदलला आणि पावसासा सुरूवात झाली. हरिश्चंद्र गट, पाचनई, आंबीत व अन्य भाग धुक्यांनी लेपाटून गेला आहे. रात्रीतून पाऊस वाढण्याची शक्यता आहे.




