अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
ऐतिहासिक भूईकोट किल्ला या निसर्गरम्य परिसरात मोठ्याप्रमाणात नागरिक फिरण्यासाठी, व्यायामासाठी येत असतात. नागरिकांना स्वच्छ व भरपूर ऑक्सिजन मिळावा यासाठी एनसीसीच्या छात्रांनी किल्ला परिसरात एक हजार झाडे लावली आहेत.
भूईकोट किल्ला ही जिवंत वास्तू आहे. या वास्तूच्या सौंदर्यात अधिक भर घालण्यासाठी हा विशेष उपक्रम राबवला आहे. नगर शहरात विविध ठिकाणी तीन हजार झाडे लावण्याचे नियोजन केले आहे. या संकल्पपूर्ती साठी एनसीसी छात्र चांगले योगदान देत आहेत. भूईकोट किल्ला परिसरात येणार्या नागरिकांनी लावलेल्या झाडांची निगा राखून त्यांना वाढण्यासाठी सहकार्य करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन 57 महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडींग अधिकारी कर्नल पंकज साहनी यांनी केले.
पेमराज सारडा महाविद्यालय व आठरे पाटील पब्लिक स्कूलच्या एनसीसीच्या 100 छात्रांनी ही झाडे लावली. यावेळी लेफ्टनंट कर्नल नारायण दास, कर्नल जयस्वाल, कर्नल समीर सरदाना, सारडा महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी डॉ.अंकुश आवारे, आठरे पाटील पब्लिक स्कूलचे महेश कुळधरण आदींसह 57 महाराष्ट्र बटालियनचे अधिकारी उपस्थित होते.