
ओझे | वार्ताहर Oze
लखमापूर परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत असल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दहेगाव येथील एका दुचाकीस्वारावर बिबट्याने अचानक हल्ला करत जखमी केले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शिवाजी पांडुरंग कड हे आपले दैनंदिन काम आटोपून दहेगाव येथे सायंकाळच्या सुमारास सात वाजेदरम्यान रोहिदास कड यांच्या समवेत घरी जात असताना लखमापूर गावचे पुढे त्यांच्या वाहनावर बिबट्याने हल्ला केला. त्यांचे हातावर पंजा मारल्याने ते गाडीच्या खाली पडले आणि आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. शिवाजी कड यांना दिंडोरी येथे डॉ. बागमार यांच्याकडे उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आले.
रक्तस्राव होत असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्यांना इंजेशन आदी उपचार केल्यानंतर नाशिकच्या एका खाजगी दवाखान्यात उपचार सुरु आहे. दुसरी घटना म्हणजे लखमापूर गावातील कुमार जोपळे आणि साहिल चौरे हे दोघे जण शालेय कामकाजासाठी बाहेर गेले होते. परंतु येतांना मळ्यातील वस्तीवरील आपले घरी जात असताना त्याच रस्त्यावर रात्री १०.३० वाजे दरम्यान हे दोघे हळू गाडीवर बोलत चालले असताना त्यांचे नजरेत बिबट्या आपल्यावर हल्ला करीत असल्याचे निदर्शनात येत असताना गाडी जोरात चालविली. मागे बसलेला साहिल हा जोरात ओरडला की बिबट्या आला. पण त्याच वेळेत बिबट्याने त्यांच्यावर झेप घेतली. गाडी जोरात असल्याने हे दोन्हीही मुले हल्ल्यातून वाचले, परंतु बिबट्या दूर जाऊन पडला आणि लगेच धूम ठोकली.
परंतु हे दोघे इतके घाबरले होते की त्यांना बोलता पण येत नव्हते. या सर्वांच्या बाबतीत दैव बलवतर म्हणावे लागेल. लखमापूर – दहेगाव हा रस्ता कायम रहदारीचा असल्याने बिबट्याचे वास्तव्य तिथेच असल्याचे बोलले जाते. या रस्त्यावरून दहेगाव, वाघळुद आदी मळ्यातील वस्त्यांवरिल विद्यार्थी मोठ्या प्रमाणात लखमापूरला शिक्षणासाठी येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दिंडोरी तालुयात गेल्या आठ महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात तीन ठार तर सात ते आठ जण गंभीर जखमी झाले आहे. तसेच अनेक शेळ्या, मेंढ्या, कुत्रे यांचे मुत्युचे प्रमाणात दिवसेंदिवस मोठी आकडेवारी वाढत आहे.
सध्या बिबट्या हे दिंडोरी शहर, लखमापुर, दहेगाव, वागळुद, करंजवण, वनारवाडी, मडकीजांब, ओझे, म्हेळुसके, कादवा म्हाळुंगी, निळवंडी, पाडे, हतनोरे, उमंराळे नळवाडी , मोहाडी, अवनखेड, परमोरी, वाघाड, पिंपळगाव केतकी, पालखेड बंधारा, जानोरी, कोराटे, कुर्णोेली, खडकसुकेणे आदी ठिकाणी दिवसा गणीक नागरिकांना दर्शन देत असुन दिंडोरी तालुयातील जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्या अजुन किती बळी घेणार? असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
बिबट्याचा त्वरित बंदोबस्त पिंजरा लावून करावा अशी मागणी वाल्मिक मोगल, कैलास मोगल, गोविंद मोगल, समाधान शिंदे, प्रदीप जोपळे, वसंत मोगल, निवृत्ती मोगल, उमेश देशमुख यांच्यासह दहेगाव वाघळुद व परिसरातील नागरिकांनी केले आहे.




