मुंबई | Mumbai
सध्या शिवसेना-भाजपमध्ये दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपा नेते आशिष शेलार यांनी ‘महाभारत’, ‘कंस’ आणि ‘कृष्णाचा’ दाखला देत शिवसेनेवर टीकेचे बाण सोडले.
तर आशिष शेलार यांच्या याच टीकेला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाचा अभ्यास कच्चा आहे, फडणवीस धृतराष्ट्राच्या भूमिकेत आहेत, असे चोख प्रत्युत्तर दिले. दरम्यान या राजकीय महाभारतात आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांची एन्ट्री झाली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ‘पुत्रप्रेमात आंधळा झालेला धृतराष्ट्र कोण आहे हे महाराष्ट्राच्या जनतेनं मागील अडीच वर्षात पाहिलंय..शिवसेनेतील ज्येष्ठांना डावलून मर्सिडीज बॅाय’ला मंत्री केलं आणि वडील स्वतः मुख्यमंत्री बनले.पुत्रप्रेम संपत नव्हतं अन् सत्तेची खुर्ची सुटत नव्हती.शेवटी पक्षातच महाभारत घडलं.’
तसेच, ‘शेवटी पक्षातच महाभारत घडलं.आता तरी धृतराष्ट्रानं डोळ्यावरची पट्टी काढावी… डोळ्यासमोरील ‘अंधार’ दूर करावा. कित्येक घटना डोळ्यांसमोर आहेत…देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत वार करण्याची एकही संधी शिवसेनेतील कंसानं आजवर सोडली नाहीए. आता तर भ्याडपणे पुतणा मावशीला पुढे केलंय. अशा कितीही पुतणा मावशी अंगावर पाठवल्या तरी जनतेचा हा कृष्णरूपी देवेंद्र सर्वांना पुरून उरणार.. नुकतंच अर्ध्या हळकुंडानं पिवळे झालेल्यांनी हे लक्षात ठेवावं.’ असे म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांनाही लक्ष्य केलं.