Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्याभाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग

भाजपकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारीला वेग दिला आहे. लोकसभा निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढताना राज्यातील ४८ पैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवलेल्या भाजपने आता निवडणुकीच्या तयारीला वेग देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या २० तारखेपासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात २८ लोकसभा मतदारसंघात ‘घर चलो’ अभियान राबविण्यात येणार असून दौऱ्याची सुरुवात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून होणार आहे.

- Advertisement -

चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत आपल्या राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली. दौऱ्यात राबविल्या जाणाऱ्या ‘घर चलो’ अभियानाच्या माध्यमातून एका महिन्यात ३ कोटी लोकांपर्यंत केंद्र आणि राज्य सरकारच्या कामाची माहिती पोहचविण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल, असे बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात १०० तर लोकसभा मतदारसंघात ६०० कार्यकर्ते या अभियानात सहभागी होणार आहेत.

अभियानावेळी घरोघरी जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या आणि राज्यातील महायुतीच्या सरकारच्या कामगिरीची माहिती देणारी पुस्तिका वितरीत केली जाईल. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ३० ते ५० हजार नागरिकांची पक्षाच्या ‘सरल अ‍ॅप’ मध्ये नोंदणी करून त्यांच्यापर्यंत मोदी सरकारच्या कामांची माहिती थेट पोहचविणे, नवमतदारांची नोंदणी करणे ही कामेही या अभियानात केली जातील, अशी माहिती त्यांनी दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

यावेळी बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकीर्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या कार्यक्रमांचा विस्ताराने आढावा घेतला. प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर वर्षभरात राज्यात फ्रेंड्स ऑफ बीजेपी, धन्यवाद मोदीजी, युवा वॉरियर्स असे वेगवेगळे उपक्रम राबविले गेले. ‘धन्यवाद मोदीजी’ अभियानात राज्यातील मोदी सरकारच्या योजनांच्या २ कोटी लाभार्थींची पंतप्रधान मोदी यांना धन्यवाद देणारी पत्रे एकत्रित करण्यात आली आहेत. विविध क्षेत्रातील नामवंतांना ‘फ्रेंड्स ऑफ बीजेपी’ च्या माध्यमातून पक्षाच्या संपर्कात आणले गेले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ५० हजार रुग्ण मित्र तयार करण्याचे अभियानही सुरु करण्यात आले आहे, असे बावनकुळे म्हणाले.

मोदी सरकारच्या नवव्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्यात आले. या अभियानात आपण स्वतः सहभागी झालो. २०२४ च्या निवडणुकीत मोदी सरकारच पुन्हा सत्तेवर यावे यासाठी मतदान करण्याची नागरिकांची इच्छा असल्याचे या अभियानात आपल्याला दिसून आल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी नमूद केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या