संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner
मोदी सरकारने आज (रविवार दि.1) सादर केलेला अर्थसंकल्प हा देशासमोरील आर्थिक व सामाजिक संकटांवर उपाय करण्याऐवजी प्रश्न अधिक गंभीर करणारा आहे. या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा नसून महागाई व बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना नाही. अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी असून भ्रमनिरास करणारा असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना माजी मंत्री थोरात म्हणाले, देशामध्ये महागाई, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र हे नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या गेल्या नाही. अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी असून भ्रमनिरास करणारा आहे. ठप्प वेतन वाढ, कमकुवत मागणी आणि खाजगी गुंतवणुकीतील मंदी ही अर्थव्यवस्थेसमोरील मोठी संकटे आहे असे असताना रोजगार वाढवण्यासाठी कोणताही विचार दिसत नाही.
वाढत्या कर्जबोजाकडे आणि रुपयाच्या घसरनीकडेही सरकारने दुर्लक्ष केले आहे. शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्यायासाठी निधी कमी केला असून गोरगरिबांसाठी या अर्थसंकल्पात कोणतीही विशेष तरतूद नाही. अर्थसंकल्प म्हणजे थकलेल्या व दिशाहीन सरकारचा दाखला असल्याची टीका करताना या अर्थसंकल्पातून मोठमोठे आकडे दाखवले गेले. मात्र जनहिताचा कोणताही विचार नसून पूर्णपणे दिशाहीन अर्थसंकल्प असल्याची टीका त्यांनी केली.



