Wednesday, May 8, 2024
Homeब्लॉगतृणधान्य सेवन हीच आरोग्याची गुरुकिल्ली

तृणधान्य सेवन हीच आरोग्याची गुरुकिल्ली

भारतीयांचे प्रमुख अन्न म्हणून तृणधान्य ओळखले जात होते. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यात घट झाली. आपण आपले धान्य विसरून पाश्चात्य धान्याच्या मागे लागलो आणि विविध व्याधींना बळी पडलो. व्याधीपासून नको असतील तर तृणधान्याशिवाय पर्याय नाही हे आरोग्यतज्ज्ञ सांगतात. जगातील विविध देशांमध्ये तृणधान्याचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. युनोस्कोने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले आहे.

तृण कुलातील वनस्पतींच्या पोषणक्षम बियांना तृणधान्य ही संज्ञा आहे. त्यांची लागवड मुख्यत्वेकरून त्यांच्या पिष्टमय बियांसाठी केली जाते. तृणधान्यांचा उपयोग मनुष्याच्या पोषणासाठी, जनावरांच्या खाद्यांत आणि औद्योगिक उत्पादनात वापरल्या जाणार्‍या स्टार्चसाठी केला जातो. बाजरी, नाचणी, वरी, राळा, सावा, कोद्रा यांचा तृणधान्यांत समावेश होतो. तृणधान्यांपासून मनुष्याला इतर दुसर्‍या कोणत्याही पिकापेक्षा अन्नाचा जास्त पुरवठा त्यातील कार्बोहायड्रेटांमुळे होतो. तुलनेने शरीरपोषणासाठी कमी खर्चात जास्त कॅलरी तृणधान्यांतून मिळतात.

तृणधान्य खाण्याचे फायदे

- Advertisement -

बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे स्थूल व्यक्तींना ‘होलग्रेन’ म्हणजेच तृणधान्ये खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येक धान्याचे प्राथमिक रूप हे तृणधान्यच असते. शेतामध्ये पिकाची वाढ होत असताना त्यात निर्माण झालेले बियाणे म्हणजेच तृणधान्य होय. तृणधान्यांमध्ये तीन प्रकारच्या घटकांचा समावेश असतो. कोंडा म्हणजे तृणधान्याच्या सर्वात बाहेरील आवरण असते. यामध्ये अ‍ॅन्टिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि तंतुमय घटक (फायबर) मुबलक प्रमाणात असते. यातील दुसरा घटक असलेल्या अंकुरापासून दुसरे पीक उगवू शकते. या अंकुरामध्ये विविध जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि आरोग्यदायी चरबीचा समावेश असतो. एन्डोस्पर्म हा तृणधान्याचा मुख्य खाद्यपुरवठा करणारा घटक आणि तृणधान्याचा सर्वाधिक भाग याने व्यापलेला असतो. यामध्ये सर्वाधिक प्रमाणात स्टार्च आणि प्रथिने असतात. यामधील स्टार्च हा शरीराला ऊर्जा पुरवतो. तृणधान्यांमध्ये असलेले लॅक्टिक अ‍ॅसिड मोठ्या आतड्यातील चांगल्या जीवाणूंच्या वाढीस मदत करते. या जीवाणूंमुळे शरीरातील पचनक्रिया सुधारते, पोषणाचे शोषण अधिक चांगल्या रीतीने होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. भात व गहू या पिकांच्या तुलनेत तृणधान्यांमध्ये प्रोटीन कार्बोहायड्रेट, स्निग्धपदार्थ, तंतुमय पदार्थ खनिज पदार्थ, कॅलशियम, फॉस्फरस, लोह यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. तृणधान्याच्या नियमित सेवनाने लठ्ठपणा, हृदयविकार, मधुमेह, मोठ्या आतड्याचा कर्करोग होण्याचा धोका कमी असतो. यात कमी ग्लायसिमिक इंडेक्स असतात. त्याच प्रमाणे खनिजे, जीवनसत्वे व अन्टीऑक्सीडेन्ट चा यात भरपूर प्रमाणात समावेश असतो. हे धान्य शरिराची झिज भरून काढण्याचे मोलाचे काम करते.

खाणार्‍यांबरोबरच शेतकर्‍यांसाठी देखील तृणधान्य हे मोलाचे समजले जाते. तृणधान्याची पिके ही अत्यंत कमी कालावधीत घेतली जातात त्यामुळे शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भर पडण्यास मदत होते. तसेच ही पिके घेण्यासाठी कमी साधन सामुग्रीची आवश्यकता भासते. बदलत्या हवामानाचा तृणधान्याच्या पिकावर फारसा परिणाम होत नाही. अनेक पिके घेतल्याने जमिनीचा कस जातो. मात्र, या पिकांमुळे जमिनीची हानी होत नाही. कोणतेही तृणधान्य हे कमी पाण्यावर येते.

राळ्याचा विचार केल्यास यात सर्वात जास्त कॅल्शियम, तंतुमय पदार्थ असतात. रक्तातील साखर आणि मेद नियंत्रित करण्याचे काम करतो. रोगप्रतिकार शक्ती वाढवून मनुष्याला ऊर्जा देतो. पचन संस्थेच्या विकारावर मोठ्या प्रमाणात फायदा होते. हे धान्य नॉन अलर्जीक असल्याने पचनास अत्यंत हलके आहे.

राजगिर्‍याला प्रथिनांचा चांगला स्त्रोत संबोधले जाते. कॅलशियम, लोह, पोटॅशियम, झिंक या मूलद्रव्याने भरपूर असलेले राजगिरा हे धान्य आहे. पचन संस्था सुदृढ बनविण्यास मदत करते त्याचबरोबर त्वचा व केसांच्या विकारावर याचा मोठा फायदा होतो. कुटकी मध्ये सर्वात जास्त 37 टक्के तंतुमय पदार्थ असतात. शिशु आहाराकरीता हे धान्य सर्वोत्तम समजले जाते. कोडो या धान्यात लेसेथिन, व्हिटॅमीन बी, कॅलशियम, लोह, पोटॅशियम, झिंक या घटकांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो असाच काहीसे घटक सावा यामध्ये देखील असतात. वरई हे सर्वोत्तम तृणधान्य मानले जाते. हे ग्लुटनमुक्त व मॅग्नीजने समृद्ध असते. हृदय विकारासाठी हे उपयुक्त मानले गेले आहे. रक्तातील मेदाचे प्रमाण नियंत्रित करते तसेच स्तनाच्या कर्करोगावर गुणकारी मानले गेले आहे.

तृणधान्याचे क्षेत्र घटले

रब्बी ज्वारीचे क्षेत्र 30 लाख हेक्टरवरून 13 लाख हेक्टरवर आले आहे. बाजरीचे क्षेत्र 10 लाख हेक्टरवरून 5 लाख हेक्टरवर आले आहे. नाचणीचे क्षेत्र सव्वालाख हेक्टरवरून 75 हजार हेक्टरवर आले आहे. यासह राळा, वरईच्या क्षेत्रातही कमालीची घट झाली आहे. ज्वारी, बाजरी वगळता राज्यात सध्या होणारी सर्व तृणधान्यांची पिके आदिवासी पट्ट्यात आणि सह्याद्रीच्या डोंगररांगांतच होतात. परंतु या भागात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

देशाची लोकसंख्या वेगाने वाढत असल्याने देशातील जनतेला पुरेसे अन्न मिळण्यासाठी गहू आणि तांदळाच्या उत्पादनाकडे जास्त लक्ष दिले गेले. याचबरोबर बदलत्या जीवनशैलीमुळे फास्ट फूडचा काळ आला. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणून पौष्टिक आणि आरोग्याला फायदेशीर असणार्‍या तृणधान्यांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून आले आहे.

केंद्र सरकारने करायच्या उपाययोजना

राज्यात तृणधान्याची लागवड वाढायची असले तर केंद्र सरकारने राज्य सरकारला मदत करणे गरजेचे आहे. सरकारी शाळांमध्ये मुलांना आठवड्यातून एकदा तृणधान्य दिले पाहीजे, त्यासाठी केद्र सरकाराने राज्य सरकरला सूचना करणे आवश्यक आहे. पौष्टिक तृणधान्य लागवडीसाठी कृषी विद्यापीठांमार्फत विविध योजना तयार करायला हव्यात, त्याचबरोबर उद्योगांना या व्यवसायाशी निगडीत करायले हवे. शेतकर्‍यांसाठी राज्य व जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करणे गरजेचे आहे

राज्य सरकारने करायच्या उपाययोजना

पौष्टीक तृणधान्य पिकांचे क्षेत्र व उत्पादनात वाढ करणे, पौष्टिक तृणधान्य पिकांची मूल्यवर्धित उत्पादने तयार करणे, पौष्टिक तृणधान्य पिकांचा लोकांच्या आहारात वापर वाढवणे, तृणधान्याचा वापर वाढविण्यासाठी प्रचार व प्रसार करणे, तृणधान्याचा विविध योजनांमध्ये समावेश करणे.

यासाठी सामन्य नागरिकांनीही आता पुढे येण्याची गरज आहे. मी आठवड्यातून एकदा तरी तृणधान्याचे सेवन करेन अशी प्रतिज्ञा केली पाहिजे तरच तृणधान्य वाचेल, पर्यायाने माणूस वाचेल यात शंका नाही.

(लेखक राज्य सरकारच्या आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 सुकाणू समितीचे सदस्य आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या