शिर्डी । Shirdi
लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतसारखी लढलो. पण विरोधकांच्या खोटारड्यापणामुळे यश मिळालं नाही, असं वक्तव्य महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. शिर्डीत आजपासून भाजपचे अधिवेशन पार पडत आहे, या अधिवेशनात बोलताना बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं.
चंद्रशेखर बावनकुळे सुरुवातीला बोलताना म्हणाले, शिर्डीत भाजपचं (BJP) महाअधिवेशन सुरू आहे. ही श्रद्धा आणि सबुरीची भूमी आहे. या पवित्र भूमित भाजपचं अधिवेशन होतंय. श्रद्धा, सबुरी आणि भाजपची महाभरारी या संकल्पनेवर अधिवेशन होतंय. जनतेने मोठा जनादेश दिलाय, त्या मायबाप जनतेचे आभार मानण्यासाठी हे अधिवेशन होतंय. आजचा दिवस अतिशय मंगल आहे. आज राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. या महाअधिवेशनासाठी भव्य तयारी करण्यात आली. त्यानिमित्ताने स्थानिक पातळीवरील भाजपचे कार्यकर्ते, राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांचे आभार मानतो.
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, कार्यकर्त्यांनी दोन-अडीच वर्ष चांगलं समर्पण केलंय. तालुक्यापासून प्रदेशापर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलंय. लोकसभेची निवडणूक ग्रामपंचायतसारखी लढलो. पण विरोधकांच्या खोटारड्यापणामुळे यश मिळालं नाही. आपण फसलो, पण निराश झालो नाही. देवेंद्रजी अन् वरिष्ठ नेत्यांनी या नैराश्यातून बाहेर निघण्यासाठी आमच्यासमोर मार्ग ठेवला. लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही शिकलो पुढे गेलो. आम्ही काही योजना तयार केल्या. नैराश्यातून बाहेर निघालो नसतो, तर विजय झाला नसता. अच्छे दिन आयेंगे हा विचार मनात होता. पुण्यातील अधिवेशनातून देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा जिंकण्याचा शंखनाद केला.
मी कोल्हापुरात म्हटलो होतो की महायुतीचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील. कार्यकर्ते कामाला लागले आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असे बावनकुळे म्हणाले. त्यांचा शपथविधी वानखेडे स्टेडियमवर नाही पण आझाद मैदानावर झाला आणि पुन्हा एकदा डोळ्यात आनंदाश्रू पाहायाला मिळाल्याचे बावनकुळे म्हणाले. श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे. मतदारांनी आपल्याला भरघोस मतदान केलं. पदाधिकारी यांनी जिवाच रान केल म्हणून आपल्याला यश मिळाल्याचे बावनकुळे म्हणाले. त्यांच्यासाठी हे अधिवेशन आहे. कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळे मी अध्यक्ष म्हणुन चांगलं काम करु शकलो. महाराष्ट्रात धन्यवाद मोदी जी असा कार्यक्रम घेतला पाहिजे असेही बावनकुळे म्हणाले.
भाजपची ही अभुतपूर्व महाभरारी आहे. भारतीय जनता पार्टीचे 108 जागेवर लोकप्रतिनिधी निवडून आलेत. हा महाविजय कार्यकर्त्यांच्या एकीचं बळ आहे. आपण सर्वांनी निश्चित केलेल्या ध्येयामुळे यश काबिज झालंय. आपल्यासोबत झालेली बेईमानी, पाठीत खंजीर खुपसला गेला. मला आठवतं झालेला विश्वासघात, देवेंद्रजींना चक्रव्यूहात अडकवण्यासाठी केलेले प्रयत्न, देवेंद्रजींना अतिशय हीन शब्दांत हिणवलं गेलं. देवेंद्रजींनी आधुनिक अभिमन्यू आहेत, हे सिद्ध करून दाखवलं, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणालेत.
तसेच, सरकारने संघटनेला मजबूत करायचं असतं आणि सरकारने तळागाळातील लोकांना न्याय द्यायचा असतो असेही ते म्हणाले. दीड कोटी सदस्य संख्या असलेला पक्ष आपल्याला 20 तारखेपर्यंत करायचा आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यात आपल्याला महायुतीची तयारी करायची आहे. पक्षाचीही तयारी करायची आहे. तुम्ही आम्हाला सत्तेवर बसवले आहे, आता तुम्हाला सत्तेत आणायचं आहे असंही बावनकुळे म्हणाले.