बीड | Beed
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणामुळे (Murder Case) राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) आणि विरोधकांकडून मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली जात आहे. याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचे वाल्मिक कराड (Walmik Karad) यांचे नाव घेण्यात येत आहे. कराड यांना अद्याप अटक होत नसल्याने वातावरण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चाला छत्रपती संभाजीराजे यांनी हजेरी लावली आहे. यावेळी संभाजीराजेंनी माध्यमांशी संवाद साधला असता त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
यावेळी बोलतांना छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) म्हणाले की, “संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली, महाराष्ट्रामध्ये भीषण परिस्थिती झाली आहे, मला बोलायला लाज वाटते महाराष्ट्राचे बीड झालं आहे, १९ दिवस झाले अजून अटक नाही, वाल्मिक कराड बेपत्ता आहे’, असा घणाघात करंत त्यांनी आरोपी अटक होत नसल्याने संताप व्यक्त केला आहे. तसेच अशी प्रकरण राज्याला परवडणारे आहेत का, असा सवालही त्यांनी केला आहे. स्वत: पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या आहेत वाल्मिक कराड शिवाय धनंजय मुंडे यांचे पानही हलत नाही. बीडमध्ये जे चाललं आहे ते तुम्हाला पटते का. बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो आहे,स्वत: मुंडे यांचा हातात बंदुक घेऊन फोटो आहे, हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का? त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते. धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराड कुठं आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही. मुंडेंचा राजीनामा घ्यायलाच हवा, अशी मागणी यावेळी छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
पुढे बोलतांना छत्रपती संभाजीराजे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांच्यावरही टीका केली आहे. ते म्हणाले की, “अजितदादा परखड म्हणता मग त्यांना संरक्षण देत आहात, ते तुम्हाला पटतंय का. महाराष्ट्रात (Maharashtra) काय चालले आहे. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कौशल्य दाखवा, खऱ्या आरोपीला अटक (Arrested) करून दाखवा. कराड याला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा राजीनामा का घेतला नाही? हा आमचा सवाल आहे. या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे, असेही त्यांनी म्हटले.