अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील अनेक भागात उष्णतेच्या लाटेची नोंद होत असतांना शनिवारपासून राज्यात पुन्हा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आधी नगर जिल्ह्यात 19 ते 21 एप्रिलदरम्यान वादळी वार्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यात पुन्हा एक दिवसाची वाढ करण्यात आली असून जिल्ह्यात आता 22 तारखेपर्यंत अवकाळी बरसणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.
जिल्ह्यात मार्च महिन्यात अवकाळीनंतर पुन्हा 1 एप्रिलला बेमोसमी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर उन्हाचा कडका वाढला होता. जिल्ह्यातील तापमान 42 अंशापर्यंत पोहचले असतांना पुन्हा अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बेमोसमी पावसाला सुरूवात होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हा पाऊस जिल्ह्यात 22 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत येलो अर्लट जाहीर केला असून यादरम्यान जिल्ह्यात वादळीवार्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
उन्हासह ढगाळ वातावरण
जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून कडाक्याच्या उन्हासह सावलीचा खेळ सुरू होता. यामुळे वातावरणात देखील बदल झाल्याचे जाणवत होते. हवेत दमटपणा वाढल्याने नागरिकांना उष्णता असाह्य झाल्याचे दिसून आले. तसेच रात्रीच्या उष्णतेत देखील चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले.




